१० वी च्या विद्यार्थ्यांच्या कलमापन चाचणीबाबत शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – १० वी इयत्तेतील विद्यार्थ्यांच्या कलमापन चाचणी परीक्षा पद्धतीत बदल करण्यात आला आहे. ही चाचणी मोबाइल अ‍ॅपद्वारे घेण्यात येणार आहे. असा  निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. १० वी च्या विद्यार्थ्यांना त्यांचा उच्च शिक्षणासाठीचा कल ओळखता यावा, यासाठी ही कलमापन चाचणी ऑनलाइन पद्धतीने घेतली जात होती. परंतु ही कलमापन चाचणी २०१९ पासून महाकरिअर मोबाइल अ‍ॅपद्वारे घेतली जाणार आहे. यासाठी विभागीय स्थरावर जिल्ह्यात, तालुक्यात शिक्षकांना या अँड्रॉइड अ‍ॅपबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. याबाबतचे परिपत्रक काढून कलमापन चाचणीची माहिती देण्यात आली आहे.
कलमापन चाचणी परीक्षा ही चाचणी महाराष्ट्र विद्याप्राधिकरण, पुणे आणि श्यामची आई फाऊंडेशन यांच्या वतीने घेतली जाते. त्यासाठी आवश्यक प्रशिक्षणाचे आयोजन, तसेच प्रशिक्षणार्थींच्या नियुक्त्या जिल्ह्यातील विभागीय मंडळांनी त्यांच्या स्तरावर करण्याच्या सूचना शिक्षण मंडळाकडून देण्यात आल्या आहेत.

या प्रशिक्षणासाठी तालुकानिहाय दोन प्रशिक्षणार्थींची ‘मास्टर ट्रेनर’ म्हणून नेमणूक करण्यात आली असून, त्यांना श्यामची आई फाउंडेशन मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे मास्टर ट्रेनर तालुक्यातील शाळांना मोबाइल अ‍ॅपद्वारे प्रशिक्षण देतील. यासाठी तंत्रस्नेही शिक्षक, व्यवसाय शिक्षण विषयाच्या शिक्षकांची निवड करण्याची सूचनाही मंडळाने केली आहे.त्याचप्रमाणे, ही चाचणी मोबाइल अ‍ॅपद्वारे घेण्यात येणार असल्याने, शाळेचे मुख्याध्यापक आणि संबंधित कर्मचाऱ्यांचा संपर्क क्रमांक, यू डायस क्रमांक तयार ठेवण्याचे निर्देश करण्यात आले आहेत.
सदर परीक्षा डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात शाळेतच मोबाईल अ‍ॅपद्वारे घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सांगण्यात आले आहे. त्यामुळे संबधित सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांचे मोबाइल नंबर, ओटीपी कोड, ऑथेंटिकेशन या सर्वांची माहिती देणे यासाठी आवश्यक असणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्ड म्हणजेच दहावीची परीक्षा १ मार्च २०१९ ते २२ मार्च २०१९ दरम्यान घेण्यात येणार आहे.
या कारणासाठी घेतात कलमापन चाचणी परीक्षा –
महाराष्ट्रातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांमधून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कल चाचणी हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची अभिरूची आणि अभिक्षमता चाचणी घेण्यात येते. याचा दहावीनंतरच्या करिअर निवडीसाठी उपयोग होतो. या वर्षी ही चाचणी मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून घेण्यात येणार असून, यासाठीचे प्रशिक्षण विभागस्तरावर २६ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर दरम्यान करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

हजारो शिवसैनिकांच्या आयोध्यावारीचे स्वप्न भंगले