पुण्यात पुन्हा एकदा जळीतकांड ; गंज पेठेत ५ गाड्या जळून खाक

पुणे : पोलीसनामा आॅनलाइन – आपल्यातील वादाबाबत रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्यांना लक्ष्य करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून गुरुवारी पहाटे पुन्हा एकदा गुंडांनी गंज पेठेत दुचाकी वाहनांना आपले लक्ष्य केले. गंज पेठेतील नाल्याजवळ पार्क केलेल्या ५ गाड्यांना कोणीतरी आग लावून पेटवून दिले. त्यात या पाचही गाड्या जळून खाक झाल्या. सुदैवाने अग्निशामक दलाची गाडी २ ते ३ मिनिटात तेथे पोहचल्याने ही आग तातडीने विझविली. नाही तर या दुचाकीच्या मागच्या बाजूला असलेल्या टपऱ्यांना आग लागण्याची शक्यता होती.

गंज पेठेतील लहुजी वस्ताद तालीमजवळ नाल्याशेजारी काही जणांनी आपल्या दुचाकी पार्क केल्या होत्या. पहाटे सव्वा तीन वाजता कोणीतरी येथील पाचही दुचाकींना एकाच वेळी आग लावली. याची खबर ३ वाजून २० मिनिटांनी अग्निशामक दलाला मिळाली. मुख्य केंद्रापासून हे ठिकाण जवळच असल्याने अग्निशामक दलाची गाडी तातडीने तेथे पोहचली. तोपर्यंत या पाचही गाड्या ४० ते ४५ टक्के जळाल्या होत्या. जवानांनी पाणी मारुन ही आग तातडीने विझविली. या गाड्यांच्या मागे काही टपऱ्या होत्या. या टपऱ्याचालकांनी उन्हाच्या त्रासापासून सरंक्षणासाठी पुढे बार उभारुन कापडे लावली होती. गाड्यांना लागलेल्या आगीत ती कापडे जाळली. त्यांचे बारही वितळले. पहाटेच्या सुमारास ही  घटना घडल्याने अग्निशामक दलाला उशिरा माहिती मिळाली. आणखी उशीर झाला असता तर या टपऱ्याही पेटल्या जाण्याची शक्यता होती.

एकाचवेळी पाचही गाड्यांना आग लागल्याने ती जाणिवपूर्वक कोणीतरी लावल्याची शक्यता अग्निशामक दलाचे अधिकारी प्रदीप खेडेकर यांनी व्यक्त केली आहे.

शहरात पार्क केलेल्या गाड्यांना आगी लावण्याचे, त्यांची तोडफोड करुन आपली दहशत निर्माण करण्याचे प्रकार वाढत आहे. पण या प्रकारामुळे सामान्यांना त्याचा किती त्रास होतो, याचा विचार नवी पिढी करताना दिसत नाही. शहरात घडलेल्या आजवरच्या अशा घटनांमध्ये प्रामुख्याने अल्पवयीन मुले तसेच १८ ते २५ वयाच्या तरुणांनी ही कृत्ये केल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे.

चाकण हिंसेचा मराठा आंदोलनाशी काहीही संबंध नाही : पोलिस आयुक्‍त आर. के. पद्मनाभन