पिंपरी चिंचवड : पोलीसनामा आॅनलाइन – महापालिकेच्या वतीने ‘अभय योजना’ राबविण्यात आली होती. ही योजना अनधिकृत नळजोड अधिकृत करण्यासाठी असून त्यात सव्वा पाच हजार नळजोडीसाठी अर्ज देखील करण्यात आले. या वरून या आधी सव्वा पाच हजार अनधिकृत नळ जोडले गेले होते. ही अभय योजना राबवूनही अर्ज न करणाऱ्या २१५ जणाचे नळजोड तोडले आहेत.
पिंपरी महापालिका परिसरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. उपाययोजना म्हणून ही टंचाई दूर करण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्रयत्न सुरू केले. पाण्याच्या व्यवस्थापनावर त्यांनी विशेष लक्ष दिले होते. त्यानुसारच पाणी गळती कमी करण्यासाठी आणि पाणी चोरीवर पर्याय म्हणून अभय योजना राबविण्यात अली. अभय योजनेचा लाभ सर्वांनीच घ्यावा, असे आवाहन देखील प्रशासना मार्फत करण्यात आले होते. त्यासाठी विशेष मुदत देखील देण्यात अली होती त्यानंतर ती वाढविण्यात देखील अाली. दिलेल्या मुदतीत सुमारे पाच हजार दोनशे पन्नास अर्ज महापालिकेकडे दाखल झाले होते. त्यानुसार त्यांना नळजोड देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अभय योजनेत सहभागी न होणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा देखील आयुक्तांनी दिला होता. त्यानुसारच नळजोड तोडण्याची कारवाई सुरू केली आहे. त्याबरोबरच गुन्हे दाखल करावेत,असे निर्देशही महापालिकेने दिले आहेत. पाच दिवसात पाणीपुरवठा विभागाच्या ६ झोन मधून २१५ जणांवर कारवाई देखील करण्यात अली आहे. एक नोव्हेंबर रोजी १८८ तर चार डिसेंबरला २७ नळजोड तोडले होते.