मोदी, शहा, फडणवीसांना जळगावात दुग्धाभिषेक

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – आदिवासी टोकरे कोळी, मल्हार कोळी, महादेव कोळी व इतर आदिवासी समाजावर होत असल्याने आदिवासी वाल्मिकलव्य सेनेतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुखवटे घातलेल्या तिन व्यक्तींना दुध-तुपाने अभिषेक घालून निषेध व्यक्त केला.

टोकरे कोळी, मल्हार कोळी, महादेव कोळी समाजाला त्यांच्या अनुसूचित जमातीच्या हक्कापासून राजकीय दबावापोटी वंचित ठेवण्यात येत आहे. म्हणून समाजाच्यावतीने अनेक आंदोलने करण्यात आली. मात्र, शासनाने दखल घेतलेली नाही. भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी टोकरे कोळी, मल्हार कोळी व महादेव कोळी समाजाचे प्रश्न सहा महिन्यांच्या आत सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सरकारला आश्वासनांचा विसर पडला आहे. आदिवासी कोळी समाजबांधवांना विनाविलंब व विनाअट जातीचे दाखले देण्यात यावेत, आदिवासींच्या प्रश्नांवर तत्काळ कार्यवाही व्हावी, अन्यथा गुर्जर, जाट, मराठा आंदोलनाप्रमाणे तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही आंदोलनप्रसंगी देण्यात आला. सरकारने आगामी निवडणुकांपूर्वी कोळी समाजाचे प्रश्न सोडवले नाहीत तर कोळी समाजबांधव मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकून भाजप सरकारला जागा दाखवतील, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.

अनुसूचित जमातीचे दाखले निर्गमित करण्यासाठी २३ जुलै २०१० रोजी शासनाच्या आदिवासी कल्याण समितीने सुरेश धस यांच्या नेतृत्त्वाखाली ज्या शिफारशी शासनाला केल्या त्या तत्काळ लागू कराव्यात, केंद्रामध्ये जात पडताळणी समिती नाही म्हणून आदिवासींना त्रासदायक ठरणारी जात पडताळणी समिती रद्द करावी व त्या ऐवजी अतिरिक्त जिल्हाधिकारी या दर्जाच्या स्तरावर स्वतंत्र अधिकारी उपाध्यक्ष म्हणून नेमण्यात यावे, सन १९५० पूर्वीच्या जमातीबाबतच्या किंवा ठिकाण बाबतचा लेखी पुरावा आदिवासींकडे मागण्यात येवू नये, ज्यांच्याकडे रक्ताचे संबंधातील नातेवाईकांचे जातवैधता प्रमाणपत्र असेल त्याला जास्त चौकशी न करता एक महिन्याच्या आत जातवैधता प्रमाणपत्र देण्यात यावे या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे.