दोघी बहिणी एकाच दिवशी झाल्या विधवा

आैरंगाबाद : पोलीसनामा आॅनलाईन – दोघा साडूंना सोबतच आपला प्राण गमवावा लागल्याने दोन्ही बहिणी एकाच वेळी विधवा झाल्याची घटना समोर आली आहे. औरंगाबादमधील सिल्लोड तालुक्यातील ही  दुर्दैवी घटना आहे.  माहेरी गेलेल्या पत्नीला आणण्यासाठी हे दाेघे निघाले होते याचवेळी ही दुर्दैवी घटना घडली.  गुरूवारी रात्री साडेअकरा वाजता हा भीषण अपघात झाला.
असा झाला अपघात 
अपघातात मृत्यू पावलेल्या एकाचे नाव सुनील विनायक काकडे  आहे. त्यांचं वय ३४ वर्षे आहे. औरंगाबादमधील सिडकोमध्ये ते राहतात. तर दुसरे म्हणजे जगन्नाथ फकिरबा बोडखे (४० वर्ष ) असून ते फुलंब्री तालुक्यातील डोंगरगावचे रहिवासी आहेत. हे दोघेही साडू इंडिका कारने (एमएच २० डीएम ९०७६) सिल्लोडमधील डोंगरगावकडे (कवाड) निघाले होते. परंतु अचानक चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार झाडाला जाऊन आदळली. . मध्यरात्रीदरम्यान घडलेल्या या अपघातात सुनील काकडे आणि जगन्नाथ बोडखे यांचा जागेवरच मृत्यू झाला. जगन्नाथ यांचे बंधू भीमराव बोडखे या अपघातात गंभीर जखमी असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.रात्री साधारण ११.३० वाजता राजूर रोडवरील पाल फाटा येथे ही घटना घडली.
सुनील काकडे आणि जगन्नाथ बोडखे हे एकमेकांचे साडू होते. त्यांच्या मृत्यूमुळे डोंगरगावच्या (कवाड) दोन बहिणींवर एकाच दिवशी विधवा होण्याची वेळ आली आहे. डोंगरगाव गावावर शोककळा पसरली आहे. ही घटना ऐकताच दोन्ही बहिणींच्या पायाखालची जमीनच सरकली. या दोन्ही बहिणींना चांगलाच मानसिक धक्का पोचला आहे. अचानक झालेल्या या घटनेने त्यांच्यावर आभाळ कोसळल्यासारखी स्थिती आेढवली आहे.