करवीर तालुक्यात असणाऱ्या सांगरूळ गावचे बाजीराव खाडे हे रहिवासी आहेत. मुख्य म्हणजे बाजीराव खाडे हे गेल्या काही वर्षांपासून राजीव गांधी पंचायत राजमध्ये सक्रिय असून १९९६ पासून ते काँग्रेस पक्षाचे काम करत आहेत. खाडे यांनी तेलंगणाचे प्रभारी म्हणूनही काम पाहिले आहे. आता काँग्रेसच्या उत्तर प्रदेश पूर्व विभागाचे प्रभारी सचिव म्हणून खाडे यांची निवड करण्यात आली आहे. गेल्या महिन्यातच त्यांची काँग्रेसच्या जाहीरनामा प्रदेश समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे.
एमएससी अॅग्री एमबीए असं खाडे यांनी शिक्षण घेतलं आहे. विशेष म्हणजे त्यांना शासनाने कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने गौरवले आहे. इतकेच नाही तर, यशवंत बँकेचे संचालाक आणि कुंभी कासारी परिसरातील शेतकरी, दूध उत्पादक यांच्या न्यायासाठी लढणारा कार्यकर्ता अशी खाडे यांची ओळख आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुन्या निष्ठावंतर कार्यकर्त्यांना संधी देण्यात येत असल्याचे समजत आहे. खाडे हे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.
उत्तर प्रदेशमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीत खाडे हे प्रियांका गांधी यांच्या टीममध्ये असणार आहेत. या टीममध्ये जुबेर खान आणि कुमार आशिष यांचाही समावेश असणार आहे. खाडे यांना या पदावर काँग्रेसचे सरचिटणीस खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी पत्र दिले आहे.