म्हाडाची मोठी घोषणा, ‘या’ शहरांमध्ये लवकरच निघणार लाॅटरी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत. लवकरच आचारसंहिता लागू होऊ शकते. परंतु त्याआधी आता मुंबई, पुणे आणि नाशिकमधील नागरिकांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याची चिन्हं दिसत आहेत. कारण लवकरच आता म्हाडाच्या घराची लाॅटरी निघणार असल्याचे समजत आहे. मुंबई, पुणे, नाशिकमधील हजारों घरांसाठी लाॅटरी निघणार असल्याची माहिती  म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली आहे. विशेष म्हणजे आचारसंहिता लागण्याआधी लाॅटरी निघणार आहे. औरंगाबादमध्ये आचारसंहितेनंतर या घरांसाठी लॉटरी निघणार आहे असेही समजत आहे.

म्हाडाच्या घराच्या लाॅटरीविषयी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, मुंबईत 238 घरांसह 107 गाळ्यांसाठी लॉटरी निघणार आहे. तर पुण्यात 4464 घरांसाठी म्हाडाची लॉटरी असेल. तर दुसरीकडे नाशिकमध्ये 1000 घरांसाठी आचारसंहितेच्या आधी लॉटरी निघणार आहे तर औरंगाबादमध्ये 800 घरांसाठी आचारसंहितेनंतर लॉटरी निघणार आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना कोकणविभागात देखील 9000 घरांची लॉटरी निघणार असल्याचे सामंत यांनी सांगितले आहे. यातील घरे ही कल्याण – डोबिंवली, खोणी, अंतरर्ली या परिसरात असतील अशी माहिती सामंत यांनी दिली आहे.

तर मुंबईतल्या तुंगा पवईतील घरांच्या किंमती कमी होणार आहे असेही सामंत म्हणाले. इतकेच नाही तर,  व्यावसायिकांनी 130 कोटींचा कर थकवल्याची माहिती देतानाच,  म्हाडाचा कर थकवलेल्या खाजगी बांधकाम व्यावसायिकांविरोधात केस दाखल करणार असल्याचे सामंत  म्हणाले.

केंद्र आणि राज्य कर्मचाऱ्यांना  वेतन आयोग लागू होणार आहे. याबरोबरच आता म्हाडा कर्मचाऱ्यांसाठी देखील खुशखबर आहे असे सामंत म्हणाले. म्हाडाच्या कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग लागू होणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

5 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या