भाजपा-सेना युतीचे सरकार भिकारी : अशोक चव्हाण

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – दु:खात होरपळणाऱ्या जनतेच्या मदतीला धावून जाणारे नेतृत्व महाराष्ट्राने यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांच्या कृतीतून अनुभवले. सध्या राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा १६ हजारावर गेला आहे. माणसे किड्या-मुंग्यांसारखी मरत असताना राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री व त्यांच्या सहकारी मंत्र्यांना कुठलीही संवेदना नाही. राज्याचे संपूर्ण मंत्रिमंडळच केवळ निधी वाटपाच्या घोषणा करून जनतेच्या तोंडाला पाने पुसत आहे. हे सरकार पूर्णत: भिकारी असल्याची तोफ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी डागली.

काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेल्या चौथ्या टप्प्यातील जनसंघर्ष यात्रेचा शुभारंभ यवतमाळ जिल्ह्यातून झाला. कळंब येथील चिंतामणीचे आशीर्वाद घेऊन ही यात्रा यवतमाळात धडकली. स्थानिक समता मैदानावर आयोजित जाहीर सभेत खासदार अशोक चव्हाण यांनी सरकारच्या धोरणासह भाजप-सेनेमधील नेत्यांच्या कोडग्या प्रवृत्तीचा समाचार घेतला. ते म्हणाले, आजच्या सभेला उसळलेली गर्दी हे सरकारविरोधातील असंतोषाचे प्रतीक आहे. राज्यातील ज्वलंत समस्या सोडविण्यात सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. राज्याला नेतृत्व देणारा हा जिल्हा असून कै. वसंतराव नाईकांसह सुधाकरराव नाईकांनी हरितक्रांतीसह जलसंधारणात मोठी क्रांती घडवून आणली. विद्यमान सरकारच्या साडेचार वर्षाच्या कार्यकाळात कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, असे म्हणायचा प्रसंग जनतेवर आला असून वही लौटा दो मेरे बिते दिन असे आज जनता म्हणत आहे.

तीर्थक्षेत्र पोहरादेवीत घेण्यात आलेला मेळावा पहिल्यांदा सामाजिक असल्याचे दर्शविण्यात आले. कालांतराने हा मेळावा सेना-भाजपाचा करण्यात आला. शंभर कोटी विकासासाठी देणार, अशी मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा प्रत्यक्षात कृतीत आणल्यानंतरच खरी ठरेल. काल-परवाच साईबाबा संस्थानकडून ५०० कोेटी रुपये या सरकारने घेतले. यांना देवाचेही पैसे कमी पडतात, असे म्हणत हे मुख्यमंत्री देणारे नव्हे तर पैसे काढून घेणारे असल्याचे चव्हाण म्हणाले.

राज्याच्या एका मंत्र्याने मुख्यमंत्री देवाचा अवतार, अशी स्तुतीसुमने उधळली. ते देवाचे अवतार असते तर राज्यातील दुष्काळ नाहीसा झाला असता. मुळात त्यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या आडनावातच दानवे आहे. यामुळे ते देवाचे नसून दानवाचे अवतार असल्याचा टोला चव्हाण यांनी लगावला.