सख्खे शेजारी बनले पक्के वैरी ; क्षुल्लक कारणावरून चिमुरड्याला जिवंत जाळले 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – क्षुल्लक कारणावरून सात वर्षाच्या चिमुरड्याला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना मुंबईतील नालासोपारा येथे घडली आहे. या  घटनेत या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. फैजान कुरेशी असे या सात वर्षीय मृत मुलाचे नाव आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, बकरी बांधण्याच्या वादातून एका चिमुकल्याला जाळल्याची धक्कादायक घटना नालासोपाऱ्यात घडली आहे. उपचारादरम्यान या मुलाचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी आलोक श्रीवास्तव आणि आकाश श्रीवास्तव या दोन आरोपींना अटक केली आहे.
बकरी बांधण्याच्या करणावरून वाद 
नालासोपारा पूर्वेच्या संतोष भुवन येथील गावराई पाड्यात इजहार कुरेशी तीन मुलांसोबत राहतात. मोलमजुरी करणारे कुरेश परिसरातील एका व्यक्तीच्या बकऱ्या आपल्या अंगणात बांधून साभांळत होते. मात्र, या बकऱ्या बांधण्यावरून त्यांचा शेजारी राहणाऱ्या लोकांशी वाद होता. याच वादातून आलोक श्रीवास्तव आणि आकाश श्रीवास्तव यांनी घराबाहेर खेळत असलेला कुरेशी यांचा ७ वर्षांचा छोटा मुलगा फैजान याला पेटवून दिले. तो खेळत असताना त्याचा  शर्ट पेटवला. त्याला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात आणि नंतर नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान फैजानचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्याने दिलेल्या जबाबत आलोक आणि आकाश यांनी जिवंत जाळल्याचे सांगितले.
तुळींज पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी मला या घटनेच्या पुर्वी जाळून मारण्याची धमकी दिली होती, असा आरोप मृत फैजानचे वडील इजहार कुरेशी यांनी केला आहे. बकरीच्या वादातून ही घटना घडल्याचे तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॅनियल बेन यांनी सांगितले.