अंत्यसंस्काराहून परत येताना कारचा अपघात ; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

बेळगाव : वृत्तसंस्था – अंत्यसंस्काराहून परत येताना झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. हे कुटुंब बेळगावातील होते. कार कालव्यात कोसळून हा अपघात झाला. अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून कारचालक बचावला आहे. कारचालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

फकिरप्पा पुजेरी (29), हनुमंत पुजारी (60), नगमाण्णा पुजारी (38), पारव्वा पुजारी (50) आणि लक्ष्मी पुजारी (40) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. हे कुटुंब गोकाक येथे अंत्यसंस्कारासाठी गेलं होतं. परतत असताना सौंदत्ती जवळील कडबी गावाजवळ चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कार कालव्यात जाऊन कोसळली.

कालव्यात पाणी असल्या कारणाने कारमधील पाच जणांनी स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना जीव वाचवता आला नाही. कारचालक मात्र दरवाजा उघडून पोहत वरती आल्याने त्याचा जीव वाचला. अपघातानंतर वाचलेल्या कारचालकाने ग्रामस्थांना माहिती दिली. यानंतर कार पाण्यातून बाहेर काढण्यात आली.