मागण्या पूर्ण केल्या नाहीतर त्या कशा करून घ्यायच्या आम्हाला माहित आहे : चंद्राबाबू नायडू

दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – केंद्र सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याची मागणी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू करत आहेत. या मागणीसाठी ते दिल्लीत एकदिवसीय उपोषणाला बसले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आंध्र प्रदेशात रॅली झाल्यानंतर लगेचच चंद्राबाबू नायडू यांनी उपोषणास सुरुवात केली. नरेंद्र मोदी यांनी चंद्राबाबू नायडू प्रचारसभांसाठी जनतेच्या पैशांची नासाडी करत असल्याचा आरोप केला होता. त्यावर चंद्राबाबूंनी त्यावर मोदींचा समाचार घेत त्यांच्यावर टीका केली आहे. मागणी पूर्ण करण्यासाठीही त्यांनी इशाराही दिला आहे.

जर तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर त्या कशा पूर्ण करायच्या हे आम्हाला चांगलंच माहित आहे, अशा इशारा चंद्राबाबूंनी दिला आहे. हा आंध्रप्रदेशातील लोकांच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. जेव्हा कधी आमच्या स्वाभिमानावर हल्ला होईल आम्ही सहन करणार नाही. मी सरकारला आणि खासकरुन पंतप्रधानांना चेतावणी देत आहे की एकट्यावर हल्ला करणं थांबवा’, असं आवाहनही चंद्राबाबू नायडू यांनी दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजधर्माचं पालन केलं नाही. त्यांच्या सरकारने आंध्रप्रदेशला विशेष दर्जा देण्यास नकार दिला आहे. तुम्ही तुमचा शब्द का पाळत नाही ? जर तुम्ही केलं नाहीत तर ते कसं करुन घ्यायचं आम्हाला चांगलं माहिती आहे, असं चंद्राबाबू नायडू यांनी म्हटलं आहे.

आपल्या उपोषणाच्या एक दिवसआधी नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशमधील गुंटूर येथे सभा घेतली होती. याची गरजच काय होती, असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी गुंटूर येथे सभा घेत चंद्राबाबू नायडू यांच्यावर टीका केली होती. चंद्राबाबू नायडू राज्याचा विकास करु शकत नाही. तसंच राज्यावरील खर्चाचा हिशोब देऊ शकत नाही. त्यामुळेच विषय भरकटवत आहेत, असा आरोप नरेंद्र मोदींनी केला होता.