प्रियंका गांधींनी स्पष्ट केली लोकसभा निवडणूक लढवण्याबाबतची भूमिका 

लखनौ : वृत्तसंस्था – गेल्या अनेक दिवसांपासून प्रियंका गांधी लोकसभा निवडणुकांच्या मैदानात उतरणार का ? हा प्रश्न अनेकांना पडला होता. अनेक दिवसांपासून या प्रश्नावर सस्पेन्स होता. परंतु यावर आता पडदा पडला आहे. प्रियंका गांधींनी यावर भाष्य केलं आहे. आपण निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. सध्या पक्षबांधणीवर भर देणार असल्याचं त्यांनी सांगतिलं. शिवाय 2022 मधील विधानसभा निवडणुका जिंकण्याकडे लक्ष केंद्रित करणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मातोश्री सोनिया गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या रायबरेलीमधून प्रियंका लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत्या. परंतु काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून त्या रणांगणात उतरणार नाहीत हे आता स्पष्ट झाले आहे. तर पुन्हा याच जागेवरून आता सोनिया गांधी निवडणूक लढवण्याची शक्यता वाढली आहे.

फुलपूरच्या जागेवरुन जवाहरलाल नेहरु काँग्रेसची जागा लढवत असल्याने तो काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो. दरम्यान रिता बहुगुणा जोशींनी भाजपचा झेंडा हाती घेतला. यानंतर मात्र लखनौमध्ये काँग्रेसकडे प्रबळ दावेदार नसल्याचं दिसून आलं. प्रियंका यांनी लखनौ आणि फुलपूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत विचार करावा, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली होती.

दरम्यान प्रियंका गांधी यांनी त्यांचा  व्हॉट्सअॅप नंबर शेअर केला असून त्यांनी एक ग्रुपही तयार केला आहे. ‘चौपाल’ या नावाने त्यांनी हा ग्रुप तयार केला आहे. विशेष म्हणजे हा ग्रुप जॉईन करुन कार्यकर्त्यांनी ग्राऊण्ड लेव्हलची माहिती त्यावर पोस्ट करावी असं प्रियंका यांनी सांगितलं आहे. मुख्य म्हणजे प्रियंका गांधी जिल्ह्याजिल्ह्यात जाऊन चौपाल (छोट्या बैठका) घेणार आहेत असेही समजत आहे.