‘एका बाजूला भाजप, आरएसएसची द्वेषाची विचारधारा आहे तर दुसरीकडं काँग्रेसची प्रेमाची’

अजमेर : वृत्तसंस्था – त्यांच्या द्वेषभावनेला आपण द्वेषानं उत्तर देऊ शकत नाही. आपल्याला प्रेमानं काम करायचं आहे असं वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केले आहे. शिवाय ‘देशात सध्या सुरू असलेली लढाई विचारधारेची आहे. एका बाजूला भाजप, आरएसएसची द्वेषाची विचारधारा आहे तर दुसरीकडं काँग्रेसची प्रेमाची’ असं म्हणत राहुल गांधी यांनी भाजप तसेच, आरएसएसच्या विचारधारेवर टीका केली आहे.

‘आम्हाला हे प्रदेश प्रेमानं जिंकायचे आहेत’

राजस्थानमधील अजमेर येथे काँग्रेसप्रणित सेवादलाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. नागरिकत्व विधेयकावरून ईशान्य भारतात तणावाचे वातावरण आहे. याचे संदर्भ देत राहुल गांधी यांनी भाजप तसेच आरएसएसवर सडकून टीका केली. यावर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, ” भाजपनं ईशान्य भारताला तणावाच्या वणव्यात लोटून दिलं आहे. मात्र, आम्हाला हे प्रदेश प्रेमानं जिंकायचे आहेत. आम्हाला नव्यानं सुरुवात करण्याची गरज आहे. सेवादलाची ताकद वाढवायची आहे. द्वेषानं द्वेष जिंकला जाऊ शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत मला, माझ्या कुटुंबाला, काँग्रेस पक्षाला दोष देत असतात. पण मी ते सगळं विसरून त्यांना संसदेत मिठी मारली. माझ्या त्या कृतीनं त्यांच्या मनातील द्वेषावर मात केली होती.” असेही ते यावेळी म्हणाले.

‘भाजपसाठी भारत ही एक वस्तू आहे. पण आमच्यासाठी हा देश सर्वांना सामावून घेणारा एक समुद्र आहे. प्रेम हाच या देशाचा मूळ स्वभाव आहे. इथं द्वेष फार काळ टिकत नाही आणि या देशात कुणालाही घाबरण्याची गरज नाही,’ असंही राहुल म्हणाले.

‘आम्ही त्यांची हत्या करणार नाही पण २०१९ मध्ये त्यांना हरवणारच’

भाजप ला हरवण्याचा आपला निर्धार पक्का आहे हे सांगताना राहुल गांधी म्हणाले की, “इंग्रजांनी १९२७ साली सेवादलावर बंदी घातली होती. महात्मा गांधींसह काँग्रेसचे अनेक नेते तुरुंगात राहिले. पण ते कधी इंग्रजांपुढं झुकले नाहीत. याउलट, सावरकरांनी एकदा, दोनदा नव्हे तर नऊ वेळा इंग्रजांची माफी मागितली. ते भीतीवर मात करू शकले नाहीत. गांधींजींनी ही भीती दूर केली. भाजप काँग्रेसमुक्त भारताची स्वप्नं पाहत असली तरी आम्ही त्यांना संपवणार नाही. त्यांची हत्या करणार नाही. पण २०१९ मध्ये त्यांना हरवणारच” असा निर्धार राहुल गांधी यांनी यावेळी बोलून दाखवला.