आम्ही यांना पुरुन उरू ; राष्ट्रावादीचा नाद करायचा नाही !

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्धार परिवर्तन संकल्प यात्रा सिन्नर येथे पोहोचली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेते विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपच्या सोशल मीडियाच्या ग्रुपवर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर मॅसेज येत आहे. त्यावरून मुंडेंनी भाजपचा पानउतारा केला आहे.

सात महिने झाले अजून भुजबळ यांच्या छातीत का दुखत नाही, असा मेसेज भाजपच्या सोशल मीडिया गोटातून वायरल होत आहे. ही अंत्यत दुर्दैवी बाब आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात राजकारणाची इतकी खालची पातळी कोणी गाठली नव्हती, अशी घणाघाती टीका धनंजय मुंडेंनी यावेळी केली.

नाशिकचं नावलौकीक करणाऱ्या भुजबळ साहेबांना सरकारने कटकारस्थान करून अडकवले, असा आरोप मुंडे यांनी केला. त्याकाळात जर भुजबळ साहेब राजकारणात सक्रीय असते तर भाजपाचं आज अस्तित्वच नसतं, असा दावाही त्यांनी केला. त्यासोबतच आम्ही यांना पुरून उरू. राष्ट्रवादीचा नाद करायचा नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

‘मन की बात’चे अब तक छप्पन एपिसोड झाले. मात्र महत्वाच्या, संवेदनशील विषयांवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही. महागाई सारख्या गंभीर विषयावर आजपर्यंत त्यांनी एक शब्दसुद्धा काढलेला नाही. कांदा उत्पादक शेतकरी आज ढसाढसा रडत आहे. आंदोलनं करत आहेत. गेल्या निवडणुकांमध्ये केलेल्या चूकीबद्दल बॅनर लावून पवार साहेबांची माफी मागत आहे. त्यांच्या मालाला आज भाव नाही. दोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का ?, अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली.