तुम्ही त्यांना ‘राम’ म्हणत असाल, आम्ही ‘दाम’दास बोलतो !

खेड : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेची सुरुवात दमदार झाली. दुसऱ्या दिवशीही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा हा उत्साह कायम आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेना आणि भाजपच्या मंत्र्यावर हल्लाबोल केला आहे. खेडमधील सभेत मुंडेंनी मोदी सरकारवर आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

निवडणुकांच्या तोंडावर सवर्णांना आरक्षणाची घोषणा करण्यात आली. मोदी सरकारने नुकतेच जीएसटीत बदल केला. त्यावरून धनंजय मुंडे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. निवडणुकांच्या तोंडावर या सरकारला वाटतंय की जीएसटीत बदल करावा, दहा टक्के आरक्षण द्यावं. मोदींनी एवढा अभ्यास केला तरी कधी ? 2014 मध्ये 50 रूपयाला मिळणाऱ्या पेट्रॉलने 80 रूपयांचा टप्पा पार केला. तुम्हीच हिशोब लावा. मग सरकारकडून झालेली लूट लक्षात येईल, असं मुंडे यांनी म्हटलं.

ज्या कोकणानं शिवसेनेला भरभरून दिलं, त्या शिवसेनेनं कोकणी माणसाला काय दिलं ? केंद्रात सेनेचा उद्योग मंत्री असताना कोकणात एकही प्रकल्प आला नाही. राज्यातही त्यांचाच उद्योग मंत्री असताना त्यांचे काय उद्योग सुरू आहे तर फक्त भूसंपादनातून शेतकऱ्यांची अडवणूक आणि लूट, अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे.

दरम्यान, शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्यावरही त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली आहे. आमच्या मराठवाड्यात पैशांना दाम म्हणतात. असं ऐकलंय की, सेनेच्या मंत्र्याचे सुपूत्र निवडणूकीला उभे राहतायत. ते कामाच्या जोरावर नाही तर दामाच्या जोरावर. तुम्ही भले त्यांना ‘राम’ म्हणत असाल. मात्र आम्ही त्यांना ‘दाम’दास म्हणतो, असंही त्यांनी यावेळी म्हटले.