कोल्हापूरची धनश्री गोडसे ‘मिस इंडिया’ ची मानकरी

मुंबई : वृत्तसंस्था – आपल्या सौंदर्य आणि बुद्धिमत्तेच्या कौशल्यावर कोल्हापूरच्या धनश्री गोडसेने २०१९ ‘मिस इंडियाचा’ किताब पटकावला आहे. इंडियन फॅशन फियास्टातर्फे ही स्पर्धा जयपूर येथे ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान झाली होती.

या स्पर्धेत देशातील विविध राज्यातून सहा हजारांपेक्षा जास्त स्पर्धाकांनी भाग घेतला होता. अंतिम फेरीसाठी २७ स्पर्धक निवडले गेले होते. या २७ स्पर्धाकांमध्ये अंतिम फेरीत शिक्षण हे तलवारीपेक्षा सामर्थ्यवान आहे या उत्तरानेच धनश्रीने सर्वांची मनं जिंकली.

या स्पर्धेत शारीरिक सौंदर्यासोबतच हजरजबाबीपणा व्यक्तिमत्त्व, धाडस, कपड्यांची निवड या सर्व घटकांचा अभ्यास केला जातो. त्यानंतर निवड केली जाते. ह्या सर्व कसोटी पार करुन धनश्रीने मिस इंडियाचा किताब आपल्या नावावर केला आहे. धनश्रीने स्पर्धेतील यशाचे श्रेय तिच्या आई-वडिलांना दिलं आहे. जून आणि जुलैमध्ये इंडोनेशिया येथे होणार्‍या मिस इंटरनॅशनल स्पर्धेत धनश्री भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

कोण आहे धनश्री
धनश्री गोडसे ही मुळची सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील फूट या गावची आहे. धनश्रीचे वडील धन्यकुमार गोडसे हे महाड व रायगड जिल्ह्यातिल पोलिस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून काम करत होते. २०१४ साली त्यांची कोल्हापुरात बदली झाली होती. वडील पोलीस निरीक्षक असल्यामुळे त्यांची सारखी बदली व्हायची, त्यामुळे धनश्रीचं दहावीपर्यंतचं शिक्षण विविध ९ शाळांमध्ये झाले.

एखाद्या पोलिस अधिकाऱ्याची मुलगी ही या ठिकाणापर्यंत पोहोचण्याची ही पहिली वेळ आहे. सध्या तिचे बारामती येथे कार्यरत आहेत. धनश्रीने १० वीमध्ये ९४ टक्के गुण मिळाले होते. त्यांनतर तिचं महाविद्यालयीन शिक्षण विवेकानंद कॉलेजमध्ये झाले. सध्या धनश्री सांगलीतील भारती विद्यापीठात एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत आहे.