६ तास विनवणी करणाऱ्या सरकारने आश्वासनाचे पत्रच दिले नाही

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाईन – लोकपाल व लोकायुक्त यांच्या नियुक्तीसह शेतमालाला दीडपट भाव मिळावा, यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरू केलेले उपोषण मागे घेतले. तब्बल सहा तास सरकारने विनवणी केल्यानंतर आंदोलन मागे घेतले. मात्र त्या आश्वासनाचे लेखी पत्र केंद्रीय कृषी विभागाकडून अद्यापही मिळालेले नाही. त्यामुळे अण्णा पुन्हा आक्रमक झाले असून, दोन दिवसांत मौन धारण करण्याचा इशारा दिला आहे. तसेच आचारसंहितेत उपोषण सुरू करेल, असा सज्जड इशाराही दिला आहे.
 
शेतमालाच्या भावासाठी केंद्रीय कृषिमंत्री, कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष व इतर कृषी तज्ञांची समिती स्थापन करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. तब्बल सहा तास झालेल्या चर्चेत पहिले तीन तास केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंह हेही उपस्थित होते. मात्र ज्या मुद्यावर अण्णांनी उपोषण मागे घेतले, त्या आश्वासनाचे लेखी पत्रही मिळाले नाही. त्यामुळे अण्णांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
 

कृषी विभागाकडून अण्णांना अपेक्षित असलेले लेखी स्वरुपात आश्वासनांचे पत्र अजूनही मिळालेले नाही. हे पत्र उपोषण सोडताना रात्रीच मिळणे अपेक्षित होते. मात्र दोन दिवस उलटल्यानंतरही केंद्रीय कृषी विभागाने अधिकृतपणे पत्र पाठवलेले नाही. त्यामुळे अण्णांनी नाराजी व्यक्त केली आहे. जनतेप्रमाणे मलाही सरकारबद्दल शंका असल्याचे म्हटले आहे.

आणखी दोन दिवस सरकारच्या पत्राची वाट पाहणार असून, त्यानंतर सरकारचा निषेध म्हणून मौन उपोषण सुरू करणार आहे. त्याचबरोबर लोकपाल आणि लोकायुक्त याबाबत सरकारने दिलेली आश्वासने आचारसंहिता लागण्यापूर्वी पूर्ण न केल्यास आचारसंहिता लागताच पुन्हा एकदा उपोषण आंदोलन सुरू करेल.

आचारसंहितेत का करणार उपोषण ?

आचारसंहिता काळात उपोषण आंदोलन सुरू केल्यास सरकारला माझ्याशी बोलणी करता येणार नाही आणि त्यामुळे माझ्या आंदोलनाचा मार्ग मोकळा राहील. जनतेत यामुळे एक प्रकारे जनजागृती मोठ्या प्रमाणात होईल, याची नोंद सरकारने घ्यावी, असा इशारा अण्णा हजारे यांनी दिला आहे.