‘जे रोज ऐक्याला विरोध करताहेत, त्यांच्या सभा उधळा’: रामदास आठवले

औरंगाबाद : पोलीसनाम ऑनलाईन – जे रोज ऐक्याला विरोध करीत आहेत, त्यांच्या सभा उधळा असे वक्तव्य रिपाइं ‘ए’ चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. इतकेच नाही तर, जे रोज ऐक्याला विरोध करीत आहेत, त्यांच्या सभा उधळा. त्यांना वस्त्या-वस्त्यांमध्ये प्रवेशबंदी करा’ असे खुले आवाहन त्यांनी आज आंबेडकरी जनतेला केले आहे. इतकेच नाही तर, ऐक्य होत असेल तर मी मंत्रिपदालाही लाथ मारायला तयार असल्याची ग्वाहीदेखील आठवले यांनी यावेळी दिली.

जबिंदा लॉन्सवर रिपाइं ‘ए’च्या मराठवाडा विभागीय मेळाव्या चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. आजच्या या मेळाव्याला महामेळावा असे नाव दिले. तरी हा मेळावा तितका ताकदीचा वाटला नाही. सध्या रिपाइं ‘ए’चे विभागवार मेळावे सुरू आहेत. मुंबई, सोलापूरनंतर आज औरंगाबाद विभागाचा मेळावा झाला. २ आॅक्टोबर रोजी ज्या जबिंदा लॉन्सवर वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरखाली अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर व खा. असदुद्दीन ओवेसी यांची सभा झाली होती, ते मैदान आम्ही मराठवाडा विभागीय मेळाव्याच्या माध्यमातून भरून दाखवू, असे आव्हान आठवले यांनी दिले होते. परंतु तेथे मांडून ठेवलेल्या संपूर्ण खुर्च्याही भरल्या नव्हत्या. विशेष म्हणजे स्वत: रामदास आठवले यांनी या मेळाव्याची उत्सुकता वाढवली होती.

परंतु सभेतील खुर्च्या रिकाम्या राहण्यावर अनेक वक्त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. २ आॅक्टोबर रोजी सभा २८ विविध जाती समूहांची आणि एमआयएमची होती. आजचा आमचा मेळावा फक्त रिपाइं ‘ए’चा आहे, असे स्पष्टीकरण वक्त्यांनी दिले. ‘२०१९ ची मॅच आम्हीच जिंकणार. राहुल गांधी यांना फार तर ६०-७० रन काढू देणार; पण सेंच्युरी मारू देणार नाही असे वक्तव्य आठवले यांनी केल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला आणि टाळ्याही वाजवण्यात आल्या.

आजच्या मेळाव्याचे आकर्षण ठरल्या रिपाइं ‘ए’ महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा व आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले व चिरंजीव जीत आठवले. सीमा आठवले यांनी तर रामदास आठवले यांच्याप्रमाणेच कवितांच्या ओळी सादर करीत व टाळ्या मिळवत आपले भाषण केले.

जबिंदा लॉन्सवर आयोजित मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी रिपाइं ‘ए’चे प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम हे होते. उद्घाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे हे होते. मात्र, प्रमुख पाहुण्यांपैकी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खा. चंद्रकांत खैरे, शिवसेनेचे पश्चिमचे आमदार संजय शिरसट यांनी मात्र या मेळाव्याकडे पाठ फिरवली. ते आलेच नाहीत.