आर्थिक बाबींवर चर्चा करण्यासाठी कॅबिनेट समितीची बैठक काल सोमवारी पार पडली होती. त्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. त्या निर्णया नुसार आता सर्व गरिबांना गॅस कनेक्शन मोफत देण्यात येणार आहे असे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले आहे. या निर्णयामुळे जे यासाठी अपात्र ठरवण्यात आले होते त्या सर्वांना आता मोफत गॅस कनेक्शन देण्यात येणार आहे. तसेच यापूर्वी ‘२०११ च्या सामाजिक आणि आर्थिक जाती जनगणने’नुसार एलपीजी कनेक्शन दिले जात असे. अनुसुचित जाती, मागासलेला समाज आणि पंतप्रधान आवास योजना आणि अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांचा या योजनेत समावेश करण्यात आला होता. परंतु आता यामध्ये सर्व गरीब कुटुंबांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता १०० टक्के गरीब कुटुंबा पर्यंत एलपीजी कनेक्शन पोहोचेल’ असंही धर्मेंद्र प्रधान म्हणाले.
या योजनेच्या खर्च पोटी केंद्र सरकार १६०० कोटी रुपये सबसिडी म्हणून तेल कंपन्यांना दिले जात आहेत .तर या आधी दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांतील महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट मोदी सरकारच्या वतीने ठेवण्यात आले होते. परंतु आता प्रत्येक गरीब कुटुंबांना गॅस कनेक्शन मोफत दिले जाणार असल्याने गरिबाना हा मोठा दिलासा मानला जातो आहे. तीन राज्यातील पराभवाने भाजप चांगलेच सतर्क झाले असून येत्या काळात असेच काही लोक उपयोगी निर्णय मोदी सरकारच्या वतीने घेतले जाण्याची शक्यता आहे. तर शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्ज माफीचा निर्णय हि केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.