अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या रांजणगाव गणपती येथील पुजारी प्रसाद व मकरंद कुलकर्णी यांनी श्री महागणपती समोर थाळीमध्ये अर्पण केलेली रक्कम पूर्णत: त्यांना घेण्याचा हक्क आहे असे दिवाणी न्यायालयाने घोषीत करावे असा दावा दाखल केला होता.देवासमोरील थाळीतील उत्पन्न कोणी घ्यावे याबाबत मोठा वाद उत्पन्न झाला होता. त्यानंतर शिरूर तालुक्याचे तहसीलदार यांचे मध्यस्थीने सर्वसंमत्तीने गाभाऱ्यासमोर स्वतंत्र गुप्तदान पेटी ठेवण्यात आली.
या पेटीतील उत्पन्न स्वतंत्र बॅंक खात्यामध्ये जमा करण्यात येत होते. हे सर्व उत्पन्न पुजारी म्हणून वैयक्तिकरित्या घेण्याचा हक्क आहे असा कुलकर्णी बंधूंनी दावा केला होता. तसेच दाव्याचा अंतिम निकाल होईपर्यंत ही रक्कम घेण्यास देवस्थान ट्रस्टने हरकत करू नये अशी अंतरीम मनाई मागितली होती. दिवाणी न्यायालयाने पुजाऱ्यांना दाव्याचा अंतिम निकाल होईपर्यंत दरमहा पंचवीस हजार रुपये ट्रस्टने द्यावेत व गाभाऱ्यासमोर ठेवलेल्या गुप्तदान पेटीतील देणगी रकमेचा वापर करण्यास ट्रस्टला मनाई केली होती.
केवळ पंचवीस हजारच नाही तर गुप्तदान पेटीतील पूर्ण रक्कम मिळावी यासाठी कुलकर्णी बंधूंनी या निकालाविरुद्ध पुणे जिल्हा न्यायालयात अपील केले होते. तर देवासमोर भाविकांनी अर्पण केलेल्या दानपेटीतील रक्कम ही ट्रस्टची मिळकत असून त्यांवर कोणीही वैय्यक्तिकरित्या हक्क सांगू शकत नाही यासाठी देवस्थानने ट्रस्टचे वकील ॲड. शिवराज कदम जहागिरदार यांचेमार्फत या निकालाला जिल्हा न्यायालयात आव्हान दिले होते.जिल्हा न्यायाधीश विकास कुलकर्णी यांचेसमोर दोन्ही बाजूंनी प्रदीर्घ युक्तिवाद करण्यात आला.
त्याचप्रमाणे देवस्थानचे धार्मिक विधी व रुढीपरंपरांचे पालन तसेच दैनंदिन पूजाविधी करण्यासाठी तेथील पुरोहितांना योग्य मानधन देता येईल, मात्र देवापुढील उत्पन्नामध्ये कोणालाही वैय्यक्तिक हक्क सांगता येणार नाही असे या देवास्थान ट्रस्टच्या १९४२ साली तेंव्हाच्या दिवाणी न्यायालयाने तयार केलेल्या धटनापत्रात आदेशित केल्याचे जिल्हा न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले.
त्यानुसार अशा सर्व सार्वजनिक देवस्थानांच्या स्थावर व जंगम मिळकतींच्या व्यवस्थापनाची जबाबदारी विश्वस्त मंडळाचे दायित्व झाले. विश्वस्त मंडळाने या सर्व उत्पन्नाचे सुनियोजन करून करून भाविकांना जास्तीत जास्त पायाभूत सुविधा प्राधान्याने व सोई पुरविणे आवश्यक आहे.त्याचप्रमाणे ट्रस्टचा अतिरिक्त संपत्ती शैक्षणिक मदत, धर्मादाय रुग्णालय, दुष्काळ निवारण, पाणी पुरवठा अशा समाज उपयोगी कामांसाठी वापरात आणला पाहिजे. या निकालामुळे मंदिराच्या विश्वस्तांना व्यापक सामाजिक कार्यासाठी निधी उपलब्ध होईल.