चंदू चव्हाण पाकिस्तानमध्ये कसे गेले ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय जवान चंदू चव्हाण यांच्यावर पाकिस्तानमध्ये अंधाऱ्या कोठडीमध्ये झालेल्या छळावर आधारीत पुस्तकाचे लवकरच प्रकाशन होणार आहे. पत्रकार संतोष धायबर यांनी हे पुस्तक लिहीले आहे.

जवान चंदू चव्हाण यांना पाकिस्तानने 29 सप्टेंबर 2016 रोजी म्हणजे सर्जिकल स्ट्राइक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच पकडले. पाकिस्तानने त्यांची रवानगी अंधाऱ्या कोठडीत केल्यानंतर अनन्वीत छळ केला. परंतु, निधड्या छातीने तो छळ सहन केला. समोर मृत्यू व बेदम मारहाण होत असतानाही ते भारत माता की जय म्हणून सामोरे जात होते. हा छळ तब्बल 3 महिने 21 दिवस सुरू होता. अखेर 21 जानेवारी 2017 रोजी नरकयातनांमधून सुटका झाली.

चंदू चव्हाण पाकिस्तानमध्ये कसे गेले? त्यांच्यावर कशाप्रकारे छळ झाला, मारहाण व समोर मृत्यू दिसत असतानाही ते निधड्या छातीने कसे सामोरे जात होते. काळ्या कोठडीमधील भिंतीशी ते काय बोलत होते, देवाकडे त्यांचे काय मागणे होते? चंदू चव्हाण यांना पकडल्यानंतर भाऊ व जवान भूषण चव्हाण यांची काय अवस्था झाली, आजीचा कसा मृत्यू झाला, चंदू यांना भारतात आणण्यासाठी भारत सरकारने कशा प्रकारचे प्रयत्न केले, याबद्दलची माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली असून, यांसह अन्य सविस्तर माहिती पुस्तकात कथन करण्यात आली आहे.

जवान चंदू चव्हाण यांचे बालपण, लष्करातील भरतीसह पाकिस्तानमध्ये झालेला छळावर आधारीत सविस्तर माहिती पुस्तकामध्ये आहे. पुस्तकासाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची प्रस्तावना आहे. मराठी व हिंदीमध्ये हे पुस्तक तयार करण्यात आले असून, लवकरच इंग्रजी आवृत्तीमध्येही येणार आहे. पुणे येथील ईश्वरी प्रकाशन पुस्तक प्रकाशीत करत आहे. पुस्तक ऑनलाइन खरेदी करण्यासाठी www.chanduchavan.com या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे.