या परिस्थितीची पाहणी औरंगबाद येथील विभागीय पथकाने आज (शुक्रवार) केली. अंथरवन पिंपरी येथे डॉक्टरांचे पथक तैनात असून जनावरांना लसीकरण व इतर उपचार सुरू असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. अंथरवन पिंपरी येथे मागील काही दिवसात अज्ञात रोगामुळे जवळपास ३४ जनावरांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये गाय,म्हैस यासह शेळी व कोकरांचा समावेश आहे. मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांचे शवविच्छेदन केल्यानंतर सॅम्पल औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. शुक्रवारी उपचार सुरु असताना एक गाय व दोन शेळ्या दगावल्याची माहिती आहे.
यासंदर्भात गुरुवारी पशुसंवर्धन अधिकारी डॉ.संतोष पालवे यांना शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली होती. याप्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा २ वाजण्याच्या सुमारास शिवसंग्रामचे कार्यकर्ते नवनाथ परभाळे, विजय सुपेकर यांच्यासह इतर १० ते १५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.