‘त्या’ प्रकरणात गीतकार जावेद अख्तरांकडून दिग्दर्शक हिरानींची पाठराखण

मुंबई : वृत्तसंस्था –  काही दिवसापूर्वी ‘मीटू’ मोहिमेअंतर्गत लैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेले दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांची बाजू अनेक बॉलिवूडच्या कलाकारांनी घेतली. आर्शद वारसी, दिया मिर्झा आणि शरमन जोशी यांनी हिरानींची पाठराखण केली होती. आता या यादीत प्रसिद्ध लेखक व गीतकार जावेद अख्तर यांचे नावही सामील झाले आहे. याप्रकरणी जावेद अख्तर यांनी हिरानींचा बचाव करणारे ट्वीट केले आहे.

‘हिरानी हे फिल्म इंडस्ट्रीतील सर्वाधिक शालीन व्यक्तिमत्त्व आहे. मी १९६५ मध्ये फिल्म इंडस्ट्रीत आलो. तेव्हापासून तर आत्तापर्यंतच्या इतक्या वर्षांत इंडस्ट्रीतील सर्वांत सभ्य व शालीन व्यक्ति कोण, असे मला विचारले तर माझ्या डोक्यात पहिले नाव राजू हिरानी यांचेच येईल. जी. बी. शॉने म्हटले आहेच की, जास्त चांगुलपणाच जास्त धोकादायक ठरतो, ’अशा शब्दांत जावेद यांनी हिरानींची पाठराखण केली केली आहे.
‘संजू’ चित्रपटाची सहाय्यक दिग्दर्शिका असलेल्या महिलेने हिरानी यांनी आपल्याशी गैरवर्तणूक केल्याचा आरोप केला होता. राजकुमार हिरानी यांनी ९ एप्रिल २०१८ ला अश्लिल शेरेबाजी केली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या घरी आणि कार्यालयात माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला.असा आरोप या महिलेने हिरानी यांच्यावर केला होता.
या आरोपानंतर हिरानी यांनी एक स्टेटमेंट दिले होते , या आरोपांना  नाकारत ते म्हणाले होते. हा सगळा माझी प्रतीमा मलीन करण्याचा प्रयत्न असून, दोन महिन्यांपूर्वी माझ्यावर असे आरोप झाल्याचे मला कळले आणि मला धक्का बसला. हे सगळे प्रकरण कुठल्या लीगल बॉडीकडे वा कमेटीकडे नेण्याचा विचार मी केला असतानाच याप्रकरणात मीडियाची मदत घेतली गेली. पण हे आरोप मला मान्य नाहीत. या आरोपांचे मी खंडन करतो. हे सगळे आरोप एका कटाचा भाग आहेत आणि माझी प्रतिमा मलीन करण्याचे प्रयत्न आहेत,असे हिरानींनी म्हटले होते.