प्रेमभंग झाल्याने प्रेमी युगुलाची आत्महत्या

वर्धा : पोलीसनामा ऑनलाईन – आई-वडिलांनी मर्जीच्या विरोधात दुसरीकडे लग्न ठरवल्याने आणि घाईगडबडीत साखरपुडा उरकल्याने नैराश्य आलेल्या एका प्रेमी युगुलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (बुधवार) उघडकीस आली.
आकोली येथील छगन उर्फ बंटी प्रल्हाद गिरी (वय- २४) व रजनी दिलीप तुमडाम (वय -२१ रा. मदना) या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र त्यांच्या घरच्यांना यांच्यातील प्रेमसंबंधाची माहिती नसल्याने दुसरीकडे लग्न जुळवून साखरपुडा ही उरकला.

तेव्हापासून दोघेही व्यथित झाले होते. मंगळवारी रात्री एक वाजताच्या सुमारास घरातील मंडळी गाढ झोपेत असताना त्यांनी पुनवटकर यांच्या शेतातील विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. घरच्यांनी ते बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच रात्रभर त्यांचा शोध घेतला पण ते सापडले नाहीत. बुधवारी सकाळी शेतातील विहिरीत दोघांचे मृतदेह आढळून आले. पोलीस पाटील अमित धोपटे यांनी घटनेची माहिती खरांगणा पोलिसांना दिली. ठाणेदार संतोष शेगावकर, जमादार कामडी, प्रेमराज बावणे, शिपाई मनिष मसराम हे घटनास्थळी दाखल झाले.