चालकाचे प्रसंगावधान ; वाचले ७२ प्रवाशांचे प्राण 

महाड : वृत्तसंस्था – पुणे- महाड गाडीला महाडमधील वरंध घाटात अपघात झाला दरम्यान चालकाच्या प्रसंगावधानामुळे तब्बल ७२ प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. विशेष म्हणजे चालकाने बसचे वेळीच ब्रेक दाबले म्हणून ठीक अन्यथा  उतारावर असलेली ही बस थेट दरीत कोसळली असती आणि मोठी जीवितहानी झाली असती.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज गुरुवार सकाळी ८ वाजता भोर आगारातून निघालेली बस महाडकडे जाणाऱ्या  मार्गावर म्हणजेच  महाडच्या हद्दीत आसलेल्या वरंध घाटात वाघजाई मंदिरापासून दुसऱ्या वळणावरील उतारावर बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला. एसटी चालकाला हा प्रकार लक्षात आला. त्यावेळी बस चालकाने प्रसंगावधान ठेऊन वेळीच ब्रेक दाबले. ब्रेक दाबल्याने बसचा मोठा अपघात टळला. अन्यथा बस थेट दरीत कोसळली असती. आणि मोठी जीवितहानी झाली असती. ही बस रस्त्यालगतच्या मातीच्या ढिगाऱ्याजवळ येऊन थांबली.
विशेष म्हणजे बस मधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत.  सर्व पप्रवाश्यांना दुसर्या बसने महाड मार्गे रवाना करण्यात आले आहे. अशी माहिती महाडचे आगार अधिकारी शिवाजी जाधव यांनी दिली. प्रसंगावधान ठेऊन ७२ प्रवाश्यांचा जीव वाचवणाऱ्या चालक मोहन बांदल याचे सर्व प्रवाशांनी कौतुक केले आहे.