ना. महाजनांनी बारामती जिंकण्यापेक्षा तालुक्यातील पाणीटंचाई सोडवावी : आ. पाटील

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर तालुक्यात ९० गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे आपल्या स्वत: च्या खात्याचा उपयोग आपल्या मतदारसंघात करता आला नाही आणि ते बारामती जिंकायला निघाले गिरीश महाजन यांनी जमिनीवर चालावे बारामतीत निवडून येण्यासाठी त्यांना १० जन्म घ्यावे लागतील अशी सडकून टीका आमदार डॉ.सतीश पाटील यांनी केली. बालाजी मंदिराच्या प्रांगणात आयोजित कार्यकर्ता मेळावा व कार्यकर्ते प्रवेश सोहळा प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील, हिम्मत पाटील, पंचायत समितीचे उपसभापती ज्ञानेश्वर पाटील ,पंचायत समिती सदस्य अशोक पाटील, नगरसेवक रोहन मोरे, दिगंबर पाटील, बाळू पाटील, मेहमूद पठाण, संजय बागडे, नितीन भोपळे, महिला पदाधिकारी सुवर्णा पाटील, सुनंदा शेंडे, ओजस्विता महाजन, पिंजारी, राकेश पाटील, पंकज बडगुजर, आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलतांना आ.सतीश पाटील म्हणाले की, ही परिवर्तनाची नांदी सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट ओसरली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने साडे चार वर्षांत घोषणा केल्यात आणि जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम त्यांनी केले.

बारामतीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शरद पवार यांचे कौतुक केले आणि एकीकडे सत्तेच्या गुर्मीत वावरणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन मात्र बारामतीत निवडणूक जिंकण्याची भाषा करीत आहे. सत्तेची हवा डोक्यावर शिरली आहे असेही पाटील म्हणाले. १८ रोजी पारोळा येथे परिवर्तन रॅली काढण्यात येणार आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार जयवंत पाटील छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली निघणार आहे. असेही यावेळी त्यांनी जाहीर केले. यावेळी नगरसेवक रोहन मोरे, जि.प.सदस्य रोहन पाटील, हिम्मत पाटील, बाळू पाटील, यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी प्रशांत बडगुजर सह असंख्य कार्यकत्र्या सह राष्ट्रवादीत प्रवेश केला. सूत्रसंचालन किशोर पाटील व आभार संजय बागडे यांनी मानले.