रुग्णांच्या उपचारासाठी २८ जिल्ह्यात ‘मेमरी क्लिनिक’

मुंबई : वृत्तसंस्था – अल्झायमर आणि स्मृतीभ्रंशाच्या रुग्णांवर उपचार आणि त्यांच्या नातेवाईकांना समुपदेशनासाठी राज्यातील 28 जिल्हा रुग्णालयांमध्ये ‘मेमरी क्लिनिक’ सुरु करण्यात आले आहेत. आतापर्यंत सुमारे 2200 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून 300 रुग्णांवर स्मृतीभ्रंशाचे उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

देशभरात अल्झायमर आणि स्मृतीभ्रंशाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. देशात 4.1 दशलक्ष रुग्ण या आजाराने ग्रस्त आहेत. जीवनकालावधी वाढत असल्याने या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये मेमरी क्लिनिक सुरु करून त्या माध्यमातून अल्झायमरविषयी ‘अर्ली डिटेक्शन सेंटर’ सुरु झाले आहे. त्याद्वारे रुग्णांच्या स्मरणशक्तीची विविध चाचण्यांच्या माध्यमातून तपासणी करण्यात येते. स्मरणशक्तीविषयी येणाऱ्या अडचणींचे अवलोकन करून त्यांचे वर्गीकरण केल्यानंतर रुग्णांवर औषधोपचार करण्यात येतो.

वेळीच औषधोपचारासाठी मेमरी क्लीनिक सुरू करण्यात आली आहेत. जिल्हा रुग्णालयांमध्ये मानसिक आजारासंबंधी तपासणी रोज केली जाते, मात्र स्मृतीभ्रंशसंबंधी आजाराच्या रुग्णांची आठवड्यातून दोन दिवस तपासणी केली जाते. आतापर्यंत रायगड, अहमदनगर, अमरावती, भंडारा, बुलढाणा, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, उस्मानाबाद, परभणी, नाशिक, सिंधुदूर्ग, वर्धा, नंदूरबार, सातारा, चंद्रपूर, पुणे, ठाणे, नागपूर, रत्नागिरी, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पालघर, औरंगाबाद, जालना, हिंगोली, लातूर, बीड, नांदेड, अकोला, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यामंध्ये मेमरी क्लिनिक सुरू करण्यात आली आहेत, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

डिसेंबर अखेरपर्यंत 2200 रुग्णांची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत सुमारे 300 रुग्णांना स्मृतीभ्रंशांचे निदान करण्यात आले असून मेमरी क्लिनिकच्या माध्यमातून रुग्णांना मार्गदर्शन व औषधोपचार केले जातात. त्याचबरोबर शारिरीक व मानसिक व्यायाम आणि विविध खेळदेखील त्यांना शिकविले जातात. विशेष म्हणजे स्मृतीभ्रंश झालेल्या रुग्णांची काळजी कशी घ्यायची याविषयी त्यांच्या नातेवाईकांना मेमरी क्लिनिकच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येते, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.