ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक ए. आर. प्रवीण यांनी परिपत्रक काढून ताडोबातील मोबाइल बंदीचे आदेश जारी केले आहेत. ताडोबात बिबट्या किंवा वाघ दिसल्यास पर्यटनाला आलेले पर्यटक इतर वाहनचालकांना किंवा पर्यटकांना मोबाइलवरून त्याची माहिती देतात. त्यामुळे इतर वाहनचालक घटनास्थळी पोहोचण्यासाठी भरधाव गाडी चालवतात. परिणामी पर्यटक आणि वाहनचालकांच्या जीवाला त्यामुळे धोका पोहोचू शकतो. शिवाय एकाच ठिकाणी सर्व पर्यटक एकत्र आल्यावर वन्यप्राण्यांचा मार्ग रोखला जातो, त्यामुळे ताडोबात मोबाइल वापरण्यास मनाई करण्यात येत असल्याचं प्रवीण यांनी या परिपत्रकात नमूद केलं आहे.
नक्की काय आहे प्रकरण
दिवाळीच्या सुट्यांमध्ये ताडोबाच्या जंगलात व्याघ्र दर्शनासाठी व जंगल सफारीचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांच्या जिप्सी वाहनामागे काल दि.११/११/२०१८ ला सकाळी आगरझरी बफर झोन मध्ये वाहनाचा वाघाने पाठलाग केला त्यामुळे पर्यटकांत काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अति पर्यटना मुळे वन्यप्रान्याना एकांतवास मिळणे कठिन झाले आहे त्यामुळे येणाऱ्या काळात ताडोबात वन्यप्राण्यांनी मानवावर हल्ले केल्यास नवल वाटायला नको.
दरम्यान अशा ठिकाणांना भेट देणारे अतिउत्साही पर्यटकांना वन्य जीवांसोबत सेल्फी आणि व्हिडीओ घेण्याचा मोह आवरत नाही . पण त्यामुळेच वन्य जीवांचे हल्ले झाल्याच्या देखील अनेक घटना आहेत .