नगरमधील बंडखोर नगरसेवकांची राष्ट्रवादीकडून हकालपट्टी, जिल्हाध्यक्षांनाही पदावरून काढले

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीमध्ये भाजपाला मतदान केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसने १८ नगरसेवकांची  पक्षातून हकालपट्टी केल्याचे समजत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना पक्षाने कॉंग्रेस पक्षाला मतदान करण्याचा आदेश असताना तो डावळण्यात आलेला असल्याने त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. मात्र आमदार संग्राम जगताप यांना अभय मिळाले असून जिल्हाध्यक्षांना अध्यक्षपदावर काढून टाकण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिल्याचे समजत आहे.
अहमदनगरमध्ये शिवसेनेला सवार्धिक २४ जागा मिळवूनही महापौर पदापासून वंचित राहावे लागल्याचे चित्र समोर आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठींब्यावर भाजपाचे बाबासाहेब वाकळे महापौर झाले. अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना पक्षाने कॉंग्रेस पक्षाला मतदान करण्याचा आदेश असताना तो डावलण्यात आला. भाजपाला राष्ट्रवादीने पाठींबा दिल्याने राजकिय वर्तुळात खळबळ उडाली.  पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशावरून जयंत पाटील यांनी ही कारवाई केली.
महत्त्वाचे म्हणजे पक्षाच्यावतीने त्यांना सात दिवसांमध्ये आपले म्हणणे मांडण्याची संधी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी नोटिशीद्वारे दिली होती परंतु यावर कोणताही खुलासा करण्यात आला नसल्याने पक्षाच्यावतीने कारवाई करण्यात आली.
फक्त नगरसेवकच नाही तर, जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांना पदावरून काढून टाकण्यात आले आहे. कारण अशा प्रकारे पक्षविरोधी कारवाई होत असताना याची कल्पना पक्षश्रेष्ठींना देणे गरजेचे होते. इतकेच नाही तर, घडलेल्या घटनेबाबत कोणताही खुलासाही त्यांनी केला नाही. यामुळे  जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांना पदावरून काढून टाकण्यात आले आहे असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या कारवाईत म्हटले आहे.