‘त्या’ शस्त्रांनी भाजपला कोणत्या दंगली घडवायच्या होत्या : जयंत पाटील

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – डोंबिवलीतील भाजपचा पदाधिकारी धनंजय कुलकर्णी यांच्या दुकानातून कल्याण गुन्हे शाखेने 170 प्राणघातक शस्त्रे जप्त केली आहेत. या बातमीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावरून सर्व पक्षांमधून भाजपवर टीका होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून तसं ट्वीट केले आहे. या व्यतिरिक्त या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीन स्पष्टीकरण देणं अपेक्षित आहे, असंही जयंत पाटलांनी म्हटलं आहे.

भाजपाचे पदाधिकारीच जर अशाप्रकारे बेकायदेशीर शस्त्रसाठा बाळगणार असतील तर राज्यात गुंड आणि दहशतवाद्यांची गरजच उरणार नाही. गुंड आणि दहशतवाद्यांची कामे भाजपाचे पदाधिकारीच करू लागले आहेत’ अशा शब्दांत पाटील यांनी भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

येणाऱ्या काळात भाजपा कशाप्रकारे राज्य सांभाळणार आहे. हेच यातून पाहायला मिळत आहे, अशी खोचक टीका जयंत पाटील यांनी केली आहे. तसंच, या शस्त्रांचा वापर करून भाजपाला कोणत्या दंगली घडवायच्या होत्या? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर स्पष्टीकरण देणं अपेक्षित आहे, अशी मागणीही पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, धनंजय कुलकर्णी हे भाजपचे डोंबिवली शहर उपाध्यक्ष आहे. यांच्या दुकानात घरात ठेवणाऱ्या शोपिस वस्तूंच्या नावाखाली खुलेआम शस्त्रांची विक्री होत होती. त्यांच्या या दुकानावर ब्रँचच्या युनिटने रात्री कारवाई केली. कारवाई करत त्यांना अटकही करण्यात आली. त्यांच्या दुकानातून तब्बल १७० घातक हत्यारे हस्तगत करण्यात आली आहेत.