मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर बेरोजगारीचा बकासूर माजणार 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राजकीय प्रचारासाठी सोशल मीडिया हे एक प्रभावशाली माध्यम बनले आहे. मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर बेरोजगारीचा बकासूर माजेल असा निशाणा राष्ट्रवादीने भाजपवर ट्विटरच्या माध्यमातून साधला आहे. यामध्ये व्यंगचित्राद्वारे बेरोजगारीचा बकासूर तरूणाईला तुडवतोय असे दाखवण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी भाजपाविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे. नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान व्हावेत यासाठी भाजपा समर्थकांनी #ComeAgainModiji हा ट्विटर ट्रेंड सुरु केला आहे. याच ट्विटर ट्रेंडला प्रतिउत्तर देत राष्ट्रवादीने ट्विट केलं आहे.

ट्विटमध्ये राष्ट्रवादीने म्हटलं आहे की, ‘खरेच मोदी परत पंतप्रधान झाले, तर वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या अशा सर्व समस्या वाढतील आणि नकारात्मकताच खूश होईल, हे मात्र नक्की.’

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. २०१९ च्या आगामी लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसे राजकीय वातावरण तापू लागले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी ज्याप्रमाणे सोशल मीडियाचा प्रभावी वापर भाजपाकडून करण्यात आला होता. आता तसाच वापर विरोधकांनी देखील सुरु केला आहे.