या प्रकरणात आता पोलिसांनी अधिक तपास करून धनंजय मुंडे यांच्यासह कारखान्याचे संचालक वाल्मीक कराड, सूर्यभान मुंडे यांच्याविरुद्ध अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तर अंबाजोगाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश गायकवाड यांनी या प्रकरणात तिघांना नोटिसा काढल्या आहेत.
मुंजा किसनराव गिते यांची जमीन ५० लाखांत घेण्यात आली. जमिनीचे खरेदीखत ७ जून २०१२ रोजी करण्यात आले. धनंजय मुंडे यांच्यासाठी मुखत्यारपत्र वाल्मीक बाबूराव कराड (पांगरी), सूर्यभान हनुमंतराव मुंडे (तळेगाव ता. परळी) यांच्या नावे करण्यात आले. शिवाय शेतकऱ्याचा मुलगा बाळासाहेब, भावाची मुले राजाभाऊ व प्रभाकर आणि नातू आत्माराम यांना साखर कारखान्यात नोकरी देण्याची हमी देण्यात आली होती. मुलगा, नातू आणि भावाच्या दोन मुलांना प्रतिमाह तीन हजार रुपयांप्रमाणे सहा महिने काम देऊन पगार दिलेला आहे. जमिनीच्या व्यवहारात ठरल्याप्रमाणे शेतकऱ्याला कारखान्याने प्रथम एक लाख व नंतर सात लाख ८१ हजार २५० रुपयांचा धनादेश दिला गेला.
त्यानंतरच बर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणात कारवाई होत नसल्याने शेतकरी गिते यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. खंडपीठाने दोषारोपपत्र किती दिवसात दाखल केल जाईल अशी विचारणा केली तेंव्हा डिसेंबर २०१८ पर्यंत दाखल केले जाईल असे शासनातर्फे सांगण्यात आले होते.