दाभोलकर-पानसरे यांच्या हत्यांचा तपास भाजप सरकारला करायचा नाही

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या होऊन आता ४ वर्षे उलटून गेली आहेत. तरी देखील त्यांच्या हत्यांचा तपास लागत नाही यावरून पोलीस यंत्रणेवर सरकारचा दबाव आहे हे स्पष्ट होते. या हत्यांच्या तपासाला आणखी १० वर्षाचा कालावधी देखील लागू शकतो. अशी हि धिम्यागतीने चालणारी सर्व व्यवस्था असले तर सामान्य लोकांनी कोणावर विश्वास ठेवायचा असा खळबळ जनक सवाल मेघा पानसरे यांनी पुण्यात उपस्थित केला आहे.

मुक्तांगण संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कार वितरण समारंभात उपस्थित असणाऱ्या मेघा पानसरे यांनी या कार्यक्रमात सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ए.पी.जोशी उपस्थित होते. त्याच प्रमाणे मुक्तांगणच्या उपसंचालक मुक्ता पुणतांबेकर, प्रसिद्ध लेखक अनिल अवचट आदी मान्यवर उपस्थित होते.

दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्यांचे तपास ४ वर्ष उलटून ही अदयाप लागले नाहीत त्यामुळे येत्या काळात लोकांनी सरकारवर आणि येथील सुरक्षा व्यवस्थेवर विश्वास कसा ठेवावा असे मेघा पानसरे म्हणाल्या आहेत. मेघा पानसरे या गोविंद पानसरे यांच्या सून आहेत. त्यांनी पानसरे यांच्या हत्ये नंतर त्यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी लढा उभारला आहे. संविधानाच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यावर सरकार कार्यवाही करण्याचे धाडस करत नाही. दुसरीकडे लोकशाहीला धोका असणाऱ्या शक्तीवर बोलणाऱ्या लोकांना ही सरकारचा उपद्रव सहन करावा लागत आहे असे मेघा पानसरे म्हणाल्या आहेत.