‘आनंद दिघेंना कुणी मारलं वगैरे नाही’, नारायण राणेंना उशिरा सुचलेलं शहाणपण 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – निलेश राणे यांनी आनंद दिघे यांच्या हत्येबाबत खळबळजनक वक्तव्य केले होते. मात्र आता नारायण राणे यांनी पडदा टाकला आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांची हत्या म्हणजे पूर्वनियोजित कटच होता, त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचे फक्त भासवण्यात आले होते असा आरोप निलेश राणी यांनी केला होता. मात्र आता नारायण राणे यांनी या दाव्याचे खंडन केले आहे. आता मात्र आनंद दिघे यांच्या मृत्यूसंदर्भात जे काही आरोप मध्यंतरी झाले ते मला मान्य नाही असे नारायण राणे यांनी स्पष्ट केले आहे. नारायण राणेंचे हे स्पष्टीकरण म्हणजे निलेश राणेंना धक्का आहे यात शंका नाही.

हेही वाचा –  ‘त्या’ भाजप लोकप्रतिनिधीची ‘अश्लील क्लिप’ व्हायरल झाल्याने प्रचंड खळबळ

निलेश राणे यांना हे वास्तव सांगेन… 
याबाबत बोलताना राणे म्हणाले की, त्यावेळी दिघेंना शेवटचा भेटणारा मी होतो. मी निघाल्यानंतर काही क्षणातच त्यांचा प्राण गेला. आनंद दिघे यांचा मृत्यू नैसर्गिक आहे. तो कोणत्याही घातपातामुळे झालेला नाही, हे मला माहीत आहे. असे नारायण राणे यांनी सांगितले. याबरोबरच यापुढे या गोष्टी बोलल्या जाणार नाहीत. मी निलेश राणे यांना हे वास्तव सांगेन, असे देखील राणे यांनी स्पष्ट केले आहे. एका वृत्तवाहिनीने भाजप शिवसेना युतीच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांची विशेष मुलाखत घेतली होती त्यावेळी दिघेंच्या मृत्यूसंदर्भात केलेल्या प्रश्नाला नारायण राणे यांनी हे उत्तर दिले.
दिघेंना शेवटचा भेटणारा मी… 
यावेळी बोलताना नारायण राणे पुढे म्हणाले की, “मी चुकीच्या आरोपांना कधीच साथ करणार नाही. आनंद दिघेंना शेवटचा भेटणारा मी होतो. मी गेलो तेव्हा दिघे यांची प्रकृती अत्यंत खालावली होती. मी बाहेर पडून बाळासाहेबांना फोन केला आणि डॉ. नितू मांडके यांना पाठवून देण्याची विनंती केली. बाळासाहेबांनी तशी व्यवस्था केली. पण डॉ. नितू मांडके येण्याअगोदरच दिघे यांचा मृत्यू झाला होता. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मी बाळासाहेबांवर याबाबत आधी जे आरोप झाले, त्याच्याशी सहमत नाही,” असे नारायण राणे म्हणाले.
मात्र दिघेंच्या वक्तव्याबाबत माहिती असताना निलेश यांनी जेव्हा वक्तव्य केले तेव्हा मात्र नारायण राणे का गप्प होते ? असा सवाल मात्र आता राजकीय वर्तुळात उपस्थित केले जात आहे. नारायण राणेंची ही सारवासारव आगामी निवडणुकांमुळे तर नाही ना ? अशी देखील चर्चा रंगली आहे.