चाकण हिंसक आंदोलन प्रकरणाच्या  तपासासाठी ‘एसआयटी’ची स्थापना

अमोल येलमार

पिंपरी-चिंचवड : सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या चाकण बंदला हिंसक वळण लागल्याने पोलिसांची वाहने, खासगी वाहने जाळण्यात आली, दगडफेक केल्याने अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी गंभीर झाले. यावेळी हजारो आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय झाल्याने चाकणचा समावेश झाला.

या गुन्ह्याचा योग्य आणि लवकर तपास व्हावा यासाठी पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांनी ‘एसआयटी’ (विशेष तपासी पथक) ची स्थापना केली आहे. लवकर या पथकाने केलेल्या तपासातून शंभरहुन अधिक जाळपोळ, तोडफोड, दगडफेक करणारे अटक केले जाणार आहेत.

सकल मराठा समाजाच्या वतीने ३० जुलै २०१८ रोजी खेड-चाकण बंदची हाक दिली होती. चाकण येथे सकाळी ११ वाजता मराठा मोर्चाच्या स्थानिक आंदोलकांनी मार्केट यार्ड चाकण येथून पायी रॅली काढून हायस्कूल शाळेतील शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर ही रॅली घोषणा देत महात्मा फुके चौक, नगरपरिषद मार्गे मुख्य रस्त्याने माणिक चौकातून पुणे-नाशिक महामार्गावर तळेगाव चौकात आली. तर तळेगाव चौकात हजारो आंदोलक महामार्गावर दुचाक्या लावून वाहने अडवून बसले होते.

दुपारी एक वाजता मराठा मोर्चाच्या आयोजकांनी हे आंदोलन संपल्याचे जाहीर करून सर्वांना घरी जाण्यास सांगितले व ते निघून गेले. मात्र, काही आंदोलक गाड्यांची तोडफोड करीत होते. त्यानंतर या तरुणांनी पोलिसांवर दगडफेक चालू केली. एसटी  बस जाळल्या, अग्निशामक बंब पेटविला, दुचाकी, एसटी बस, खासगी वाहने, तळेगाव चौकातील वाहतूक नियंत्रण करण्याची पोलीस चौकी, पोलिस व्हॅन जाळल्या. पोलीस अधिकाऱ्यांची वाहने पेटवून दिली. पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. यामध्ये अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी गंभीर जखमी झाले. एक पोलीस अनेक दिवस कोमात होता.

चाकण पोलीस ठाण्यावर देखील दगडफेक करून पोलीस ठाण्यासमोरील दोन मोटारी पेटवून दिल्या. पुरावा नष्ट व्हावा म्हणून ज्या-ज्या ठिकाणी सीसी टीव्ही आहेत ते कॅमेरे हातातील दांडक्यांनी व गजांनी फोडून टाकले. पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी आंदोलकांना तळेगाव चौकात शांततेचे आवाहन करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर जमाबंदीचा आदेश लागू केल्यानंतर वातावरण निवळले होते.

ग्रामीण पोलिसांनी सुमारे चार ते पाच हजार आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. काहींना अटक केली, आणि तपास सुरू केला. दरम्यान १५ ऑगस्ट रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय स्वतंत्र झाले आणि चाकणचा समावेश इकडे झाला. यामुळे चाकण पोलीस ठाण्यात दाखल असणारे गुन्हे वर्ग झाले. पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांनी पदभार घेतल्यापासून चाकणच्या हिंसक आंदोलनाची माहिती घेण्यास सुरुवात केली होती. दरम्यान आयुक्त आर.के. पद्मनाभन यांनी या गुन्ह्याचा तपास लवकर आणि योग्य होण्यासाठी एसआयटीची स्थापना केली. या विशेष तपासी पथकाचे प्रमुख म्हणून पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांची नेमणूक केली असून त्यांच्यासोबत चाकण विभागाचे सहायक पोलिस आयुक्त चंद्रकांत असलटवार, गुन्हे शाखेचे सतीश पाटील, चाकणचे वरिष्ठ निरीक्षक सुनील पवार, गुन्हे शाखेचे निरीक्षक उत्तम तांगडे, सुधाकर काटे यांची नियुक्ती केली आहे.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे जास्तीत जास्त आरोपी अटक करणे, आणखी काही गुन्हे दाखल होत असतील तर ते दाखल करणे, या हिंसक आंदोलनाच्या मागे कोणी राजकीय व्यक्ती, संस्था, सामाजिक नेते किंवा अन्य कोणी आहे का पाहणे, आंदोलक एवढे भडकण्याचे नक्की कारण का यासारख्या अनेक बाबींचा योग्य तपास करून लवकरात लवकर आरोपी अटक करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.

चाकण हिंसक आंदोलन प्रकरणी विशेष तपासी पथकाची नेमणूक केली असून प्रमुख म्हणून पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील या आहेत. तसेच इतरही अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. या पथकाने केलेल्या तपासातून लवकरच शंभर हुन अधिकाना अटक केली जाणार आहे. आम्ही या हिंसक आंदोलनाच्या मुळाशी जाणार असून दोषींवर योग्य कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांनी सांगितले.