प्रकाश आंबेडकरांनी माझ्याकडून ‘हे’ शिकावं : रामदास आठवले 

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकरांवर केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी टिप्पणी केली आहे. प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत, त्यामुळे मला त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. परंतू सत्ता कशी मिळवावी हे त्यांनी माझ्याकडून शिकावे, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते सोलापूरातील जाहीर सभेत बोलत होते.

प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आघाडीच्या माध्यमातून सत्तेचे स्वप्न पाहू नये. मागासवर्गीय मतांचे विभाजन होणार असल्याने त्याचा फायदा भाजप-शिवसेनेला होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने स्थापन केलेल्या वंचित आघाडीत सर्व जातीच्या नेत्यांना सामावून घेतले असले तरी २००९ च्या माझ्या अनुभवनानुसार डोक्यात हवा आणि पैसा असणारे लोकच वंचित आघाडीकडे जातील़. त्यामुळे या आघाडीला फारसे यश मिळणार नाही, असं आठवले यांनी म्हटलं आहे.

२०१२ च्या निवडणुकीत शिवशक्ती – भिमशक्तीचा प्रस्ताव आल्यानंतर राज्यभर दौरा करून कार्यकर्त्यांचा फिडबॅक घेतला. तेव्हा काँग्रेसने मला काय दिलं, असा सवाल कार्यकर्त्यांनी केला. आपली वेगळी ओळख आहे, हे कार्यकर्त्यांना पटवून दिल्यानंतर मी भाजपसोबत गेलो़. काँग्रेसवाल्यांनी भाजप हा जातीवादी पक्ष आहे, असा अपप्रचार सातत्याने केला. भाजपामध्ये सर्व जातीधर्मांचे लोक निवडून आलेले असल्यामुळे मी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, रिपाइं आणि वंचित आघाडीचा राजकीय समझोता होईल का?, असं आठवलेंना विचारले गेले. त्यावर ऐक्याची माझी तयारी आहे, मागे दोन ते तीन वेळा असे प्रयत्न झाले आहेत़. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मी काम करण्यास तयार आहे, पण सत्तेची स्वप्न पाहताना राजकारणाची हवा कोणत्या बाजूने सुरू आहे, ते पाहून निर्णय घेतला पाहिजे, असं उत्तर आठवलेंनी यावेळी दिले.