राणेंनी भाजपमुळे मिळालेल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा : राजन तेली

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – स्वाभिमान पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विश्वास यात्रेच्यावेळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपच्या तिकिटावर खासदार व्हायचे आणि त्यांचीच उणीदुणी काढायची, असे ते करत आहेत. त्यांना भाजप तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विचार पटत नसतील, तर स्वाभिमान दाखवून त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा, असा सल्ला भाजप प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी नारायण राणे यांना दिला.

कणकवली येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष संदेश पटेल उपस्थित होते. राजन तेली म्हणाले, विश्वास यात्रेत नारायण राणे यांनी सरकारवर टीका करताना सांगितले की, सी-वल्र्ड व रेडी पोर्ट प्रकल्प मी आणला तो यांनी बंद पाडला. चिपी विमानतळाचेही तसेच आहे. आडाळी एमआयडीसी, आयटीपार्कही आणले होते. हे सर्व प्रकल्प बंद केले आहेत. मात्र, १४ वर्षे नारायण राणे पालकमंत्री होते. त्या काळात यापैकी एक तरी प्रकल्प त्यांनी स्वत: पूर्ण का केला नाही? एखादा प्रकल्प पुर्ण व्हायला कितीसा काळ लागतो? असा प्रश्नही तेली यांनी यावेळी उपस्थित केला.

राजन तेली म्हणाले, नारायण राणे यांचा एक पुत्र काँग्रेस आमदार, दुसरा स्वाभिमान पक्षाचा सरचिटणीस तर ते स्वत: भाजपचे खासदार आहेत. याला नेमके काय म्हणायचे? पाटबंधारे प्रकल्प बंद असल्याचे ते सांगत आहेत. पण १९९९ मध्ये ते पालकमंत्री असताना जिल्ह्यात वनसंज्ञा लागली. त्यामुळे नरडवे, सरंबळ, टाळंबा असे प्रकल्प रखडल्याने त्यांच्या खर्चात वाढ झाली आहे. ते प्रकल्प रखडले आहेत. आता या वनसंज्ञेचे पाप कोणाच्या पदरात घालायचे? हे त्यांनी सांगावे.

सी-वल्र्ड प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती, तर ते पालकमंत्री असताना त्याचे काम का सुरू झाले नाही? रेडी पोर्टची विकासक असलेली जॉन अर्नेस्ट कंपनी ५००० कोटी रुपये खर्च करणार होती. त्या कंपनीने एक तरी नवीन वीट तिथे लावली आहे का? तेथील जेटीवरून करोडो रुपये कमावले. त्याठिकाणी फक्त स्वाभिमानच्या कार्यकत्यार्ना लोडिंग, अनलोडिंगचे काम मिळाले आहे. इतर जनतेला काय फायदा झाला? आता असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री हे अकार्यक्षम आहेतच. पण चिपी विमानतळ तसेच इतर प्रकल्पांची जबाबदारी नारायण राणे यांची नाही का? २०१४ ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आडाळी एमआयडीसीची घोषणा करण्यात आली. परंतु अगोदरपासून अस्तित्वात असलेल्या कुडाळ येथील एमआयडीसीमध्ये नवीन उद्योग का सुरु करण्यात आले नाहीत.