Pulwama Teror Attack: पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, म्हणे हल्ला आम्ही नाही ‘त्यांनी’ घडवला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथील हल्ल्यानंतर जैश -ए -मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी घेतली असताना पाकिस्तानच्या मात्र चोराच्या उलट्या बोंबा सुरु आहेत. या हल्ल्याला पाकिस्तान जबाबदार नसून या हल्ल्याचं खापर पाकने भारतीय गुप्तचर यंत्रणेवर फोडले आहे. पाकिस्तानचे माजी गृहमंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते रहमान मलिक यांनी हा हल्ला म्हणजे भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉ ने रचलेले षडयंत्र आहे असे म्हंटले आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात प्रलंबित असलेल्या कुलभूषण जाधव प्रकरणावरुन लक्ष हटवण्यासाठी रॉ ने हल्ला केल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.

भारत प्रेत्येक हल्ल्याचा आरोप पाकिस्तानवरच करतो
या हल्ल्यानंतर पाकिस्तानी वृत्तपत्र ‘द डॉन’ने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना रहमान मलिक यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यासाठी भारतीय गुप्तचर यंत्रणेला जबाबदार ठरवलं. पाकिस्तानच्या माजी गृहमंत्र्यांचं बरळणं एवढ्यावरच थांबलं नाही. भारत प्रत्येक हल्ल्याचा आरोप पाकिस्तानवरच करत असतो असंही ते म्हणाले.

समझौता  एक्सप्रेसवरही रॉनेच हल्ला केला होता : मलिक
भारत नेहमीच पाकिस्तानविरोधात षडयंत्र रचत असतो असा आरोपच रहमान मलिक यांनी केला आहे. पाकिस्तानला गुन्हेगार ठरवता यावं यासाठी रॉने समझौता एक्स्प्रेसवरही हल्ला केला होता असंही बेजबाबदार वक्तव्य त्यांनी केलं आहे. मलिक यांनी 26/11 दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांचा उल्लेख करत गंभीर आरोप केले. हेमंत करकरे यांना समझौता एक्स्प्रेस हल्ल्यात रॉ ने आणि आरएसएसचा हात असल्याची माहिती होती. यामुळेच रॉ ने त्यांना संपवलं असा दावा मलिक यांनी केला आहे.