मी शहरी बाबू, मला शेती कळत नाही : आदित्य ठाकरे

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – मला शेतीतील काही कळत नाही. मी शहरी बाबू आहे, मात्र शेतकऱ्यांचं दुःख शिवसेनेला कळत. त्यासाठी मी दुष्काळी पाहणी करण्यासाठी आलो असल्याचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले. आदित्य ठाकरे हे लातूर, उस्मानाबादच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आहेत. दुष्काळग्रस्त भागातील लोकांशी संवाद साधून शिवसेना तुमच्या सोबत असल्याचेही सांगितले.

निवडणुका येतील जातील मात्र सर्वसामान्य शेतकरी पाणीटंचाई, चाराटंचाईने त्रस्त असताना शिवसेना त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना पशुखाद्य, पिण्याच्या पाण्यासाठी टाक्यांचे वाटप केले. राज्यात पाण्याची मोठी समस्या आहे. अशा परिस्थित शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा विचार देखील मनात आणू नये, असे सांगत त्यांनी तुम्ही शिवसेनेला आवाज द्या आम्ही हजर राहू असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी दिला.

आदित्य ठाकरेंनी लातूर जिल्ह्यातील बुधोडा, लामजाना, किल्लारी आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील गावांना भेटी दिल्या. शेतकऱ्यांना मदत करताना तो कोणत्या पक्षाचा आहे, हे आम्ही पाहणार नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी नको तर सरसकट कर्जमुक्ती द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.