तेव्हा शरद पवार पंतप्रधान झाले असते. आता ते शक्य नाही : रामदास आठवले

पिंपरी (पुणे) : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पंतप्रधान व्हायचं अशी इचछा आहे. दरवेळी निवडणुकांआधी राजकीय वर्तुळात या विषयी चर्चा रंगते. यावर अनेक जण  वक्तव्य करतात. रामदास आठवले ही यावर बोलताना म्हणाले ‘काँग्रेस सत्तेत असताना शरद पवार यांचा पंतप्रधानपदी नंबर लागला असता, पण आता यापुढे कधी त्यांचा नंबर लागेल असं मला अजिबात वाटत नाही. त्यावेळी शरद पवार यांना जाणीवपूर्वक बाजूला करण्यात आलं, त्यामुळे त्यांची पंतप्रधान बनण्याची संधी हुकली’,असे विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काय म्हणाले आठवले – 
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावरील चित्रपटाविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहेत. ते अ‍ॅक्सिडेंटल पंतप्रधान झाले या मताशी मी सहमत असून पण ते व्यक्ती म्हणून चांगले आहेत. मात्र, त्यांनी नेता म्हणून कधी काम केलेले नाही, त्यावेळी मी काँग्रेस सोबत होतो. तुम्ही पंतप्रधानपद स्वीकारले पाहिजे असं मी अध्यक्षा सोनिया गांधी यांना म्हणालो होतो. आपणच पंतप्रधान व्हा, जर आपण होत नसाल तर शरद पवार यांना पंतप्रधान केलं पाहिजे अशी त्यावेळी माझी भूमिका होती, असं आठवले म्हणाले.
पुढे म्हणाले, त्यावेळी शरद पवार यांचा नंबर लागला असता, आता पुढे कधी त्यांचा नंबर लागेल असं मला अजिबात वाटत नाही. त्यांना जाणीवपूर्वक बाजूला करण्यात आलं, त्यांचा चान्स हुकला आहे. सोनिया गांधी यांना पंतप्रधान व्हायचं नव्हतं आणि शरद पवार यांना पंतप्रधान करायचं नव्हतं म्हणून अचानक मनमोहन सिंग यांचं नाव पुढे आल्याचे आठवले म्हणाले. त्यामुळे मी मनमोहन सिंग यांच्यावरील चित्रपटाशी सहमत असल्याचे ते म्हणाले.