दुष्काळाचे संकट, वेळीच उपाययोजना करा : शरद पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात सध्या दुष्काळाचे सावट आहे. त्याचे गांर्भिय लक्षात घेऊन  राज्य सरकारने निश्चित कृती कार्यक्रम हाती घ्यावा आणि वेळीच पाऊले उचलून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. त्यासोबत दुष्काळी संकटाशी सामना करण्यासाठी लागणाऱ्या उपाययोजनांची टिप्पणीही त्यांनी पाठवली आहे.

महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पर्जन्यमान कमी झाल्याने ऐन हिवाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. दुष्काळाचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. विशेषत: परतीच्या पावसाने निराशा केल्याने खरीपाचे पीक हातचे गेले असून रब्बी पिकांची पेरणी संकटात आली आहे. पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्यांच्या टंचाईमुळे पशूधनही धोक्यात आले आहे. त्यामुळे राज्य सरकारने यावर कृती कार्यक्रम हाती घ्यावा, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.

दुष्काळावर मात करण्यासाठी लागणाऱ्या उपाययोजनांची टिप्पणीही शरद पवार यांनी पत्रासोबत जोडली असून मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.