‘हॉटेलमध्ये कप-बशी धुवावी पण शेती नको’; सुभाष देसाईंचा सरकारला घरचा आहेर 

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सरकारचा घरचा आहेर दिला आहे. हॉटेलमध्ये कप-बशी धुवावी पण शेती नको, असं धक्कादायक वक्तव्य सुभाष देसाई यांनी केले आहे. शेतकऱ्यांच्या सध्यस्थितीबद्दल त्यांनी हे वक्तव्य केले आहे. ते नाशिकमधील सभेत बोलत होते.

शेतकऱ्यांची सध्या भीषण परिस्थीती आहे. हॉटेलमध्ये कप-बशी धुवावी लागली तरी चालेल पण शेती नको, अशी मानसिकता सध्याच्या शेतकऱ्यांची आणि त्यांच्या मुलांची झाली आहे, असं वक्तव्य सुभाष देसाई यांनी केलं आहे. ज्या पद्धतीने ऊसाचे आंदोलन पेटते, ज्या पद्धतीने दुधाचे आंदोलन पेटते, तसं कोणीतरी गाववाल्यांनी आंदोलन करून सरकारकडून आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या पाहिजेत, असंही वक्तव्य त्यांनी केलं आहे. या वक्तव्याने त्यांनी सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, सरकारमधील एखाद्या उद्योग मंत्र्याने असं वक्तव्य करणे म्हणजे धक्कादायक बाब आहे. त्यांनी हे वक्तव्य केल्याबरोबर तेथील उपस्थित असलेले सर्वच आवाक झाले होते. दुसरी बाजू अशी की, सुभाष देसाई हे शिवसेनेचे नेते ही आहेत, त्यामुळे शिवसेनेने एकप्रकारे भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याचं चित्र दिसत आहे. मात्र सुभाष देसाईंच्या या वक्तव्यावर भाजप काय भूमिका मांडते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.