पानटपरी व्यावसायिकाची आत्महत्या

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – पाथर्डी शहरातील पानटपरी व्यवसायिक अशोक शिवाजी सानप (वय 30, रा. शिरसाठवाडी, ता. पाथर्डी) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. शहरापासून काही अंतरावरील वनदेव खाणीच्या दरीत त्याने गळफास घेतला. सानप याने आत्महत्या का केली, याचा उलगडा होऊ शकला नाही.

याबाबत माहिती अशी की, अशोक सानप याची अजंठा चौकात पानटपरी आहे. शुक्रवारी दुपारपासून तो बेपत्ता होता. तो घरी न आल्याने कुटुंबीयांनी अजंठा चौकात चौकशी केली असता तो पानटपरीवरही आला नव्हता, असे समजले. शुक्रवारी रात्रीपर्यंत तो घरी न लागल्याने व मोबाईल लागत नसल्याने नातेवाईकांनी त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली. टपरीवर तसेच रात्री घरी न आल्याने त्यांच्या घरच्यांनी तो कुठे आहे, याची चौकशी सुरू केली. मात्र, त्याचा थांगपत्ता लागला नाही.

शनिवारी दुपारी वनदेव परिसरातील खाणीजवळील दरीत त्याचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. सदर घटनेची माहिती पाथर्डी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. घटनास्थळ पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी पाथर्डी ग्रामीण रुग्णालयात नेला. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आत्महत्या नव्हे, हत्या: नातेवाईकांचा आरोप
मयत अशोक सानप यांच्या कुटुंबीयांनी ही आत्महत्या नसून, घातपात अाहे, असा संशय व्यक्त केला आहे. शनिवारी सायंकाळी मयतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचे वाटत असले, तरी हा नेमका काय प्रकार आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.