‘सीबीआय’ संदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय 

दिल्ली : वृत्तसंस्था- काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील एका उच्चस्तरीय निवड समितीने सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना पदावरुन हटवण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आता ‘सीबीआय’संदर्भात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सीबीआयचे संचालक राकेश अस्थाना यांच्यासह चार बड्या अधिकाऱ्यांचा सेवाकाळ कमी करण्यात आला आहे. अशी माहिती समोर आली आहे. वादाच्या पार्श्वभूमीवर सीबीआयची प्रतिमा मलिन होत असल्याने केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचे समजत आहे. गुरुवारी संध्याकाळी तत्काळ हा आदेश जारी करण्यात आला आहे.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्याशिवाय सीबीआयचे संयुक्त संचालक अरुणकुमार शर्मा, डीआयजी मनिषकुमार सिन्हा, पोलीस अधीक्षक जयंत नाईकनवरे यांचाही कार्यकाळ घटवण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वीच सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील एका उच्चस्तरीय निवड समितीने पदावरुन हटवण्याचा मोठा निर्णय घेतला होता. या समितीच्या अन्य सदस्यांमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि न्या. ए. के. सिकरी यांचा समावेश होता. खर्गेंच्या विरोधानंतर हा निर्णय २-१ च्या बहुमताने घेण्यात आला होता.