…म्हणून ‘त्या’ भाजपा पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी दिले राजीनामे

धुळे : पोलीसनामा आॅनलाइन – महापालिकेच्या निवडणुकीत निष्ठावंतांना उमेदवारी नाकारुन बाहेरच्या पक्षातून आलेल्यांना उमेदवारी दिल्यामुळे धुळ्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज झाले आहेत. यामुळे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी राजीनामा सत्र सुरु केले असून देवपूर भाजप पूर्वमंडळाच्या संपूर्ण कार्यकारिणीने आपले राजीनामे पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष अनूप अग्रवाल यांच्याकडे दिले आहेत.
पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ते हे कुठल्याही पदाची अभिलाषा न बाळगता पक्षात गेल्या २५ वर्षांपासून काम करीत आहेत. सत्ता असो वा नसो फक्त भाजपाचेच काम करीत असतांना महापालिकेच्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी न देता ज्यांचा पक्षाशी कुठलाही संबंध नाही, अशा आयात उमेदवारांना तिकीटे देण्यात आली. भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस, नमामि गंगे उत्तर महाराष्ट्र संयोजक असलेले संजय गुलाबराव बोरसे हे पक्षात अनेक वर्षांपासून काम करीत आहेत. विविध आंदोलनांमध्ये त्यांच्यावर आतापर्यंत २५ राजकीय केसेस झाल्या. त्यांचे तिकीट कापून पक्षाशी संबंध नसलेल्या व्यक्तीला उमेदवारी देऊन बोरसे यांना डावलण्यात आले आहे. याचा निषेध म्हणून देवपूर पूर्व मंडळाचे अध्यक्ष व संपूर्ण कार्यकारिणी राजीनामा देत असल्याचे पत्रात नमूद केले आहे.
या पत्रावर मंडळ अध्यक्ष प्रथमेश गांधी, युवा मोर्चा मंडळ अध्यक्ष कपिल महाजन, सरचिटणीस रवींद्र शुक्ल, मयूर पाटील, बळीराम भोई, उपाध्यक्ष किशोर सूर्यवंशी, किशोर पाटील, प्रकाश चौधरी, सोशल मीडिया प्रमुख योगेश सैंदाणे, महिला मंडळ अध्यक्षा लोहालेकर, अ.ज.मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भिकन पहाडे, मोनिका शिंपी, टिनू मोरे, निशीकांत मोरे, संदीप मोरे, संदीप गुरव, राहूल गांधी, डॉक्टर सेल आघाडी प्रमुख डॉ.भगवान चव्हाण, व्यापारी आघाडी प्रमुख महेंद्र सोनार, मनोज चौधरी, विकास सूर्यवंशी, हितेश खोंडे, आशिष चौधरी, सागर पहाडे, विजय सोनवणे, मधू सोनवणे, विठोबा देवरे, सागर ठाकूर, विक्की शिरसाठ आदींच्या सह्या आहेत. तसेच निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या समर्थनार्थ सोशल मीडिया उपाध्यक्ष असलेले जयकिशन आनंदा पहाडी व महानगर जिल्हा चिटणीस दिनेश शिंदे यांनीदेखील आपल्या पदाचा राजीनामा महानगर जिल्हाध्यक्षांकडे दिला आहे.

दरम्यान, या राजीनामा सत्राबाबत प्रतिक्रिया देताना महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल म्हणाले की, संजय बोरसेंना आम्ही उमेदवारी नाकारलेली नाही. पक्षाच्या सरचिटणीसांनी त्यांना फोन करुन उमेदवारी अर्ज भरायला सांगितला होता. मात्र, त्यांनी अर्ज भरला की नाही, त्याबाबत पक्षाला कळविले नाही. अर्ज भरल्यावर त्याची एक प्रत एबी फॉर्मसाठी पक्षाच्या कार्यालयात जमा करायची असते. भाजपाचे निष्ठावान म्हणणारे संजय बोरसे स्वत:ला निष्ठावान समजतात. मात्र, आजपर्यंत कुठे होते? त्यांचे भाऊ राष्ट्रवादीतून निवडून यायचे तेव्हा संजय बोरसे उमेदवारी करायचे नाही. भाजपचा उमेदवार २०० मतांनी पडला होता, तेव्हा बोरसे कुठे होते? त्यामुळे राजीनामे म्हणजे छोट्या निष्ठावान कार्यकर्त्यांची दिशाभूल करण्याचा प्रकार सुरु झाला आहे.

आयोध्येत तणाव, स्थानिकांकडून शिवसेनेच्या कार्यक्रमाला विरोध