‘या’ नव्या तंत्रज्ञानाद्वारे ‘त्या’ महिलेच्या मृतदेहाची ओळख पटणार

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन- अनेकदा पोलिसांना काही माणसांचे मृतदेह आढळतात. परंतु हे मृतदेह कोणतीही ओळख पटण्याच्या अवस्थेत नसतात. परंतु आता एका नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने आता अशा मृतदेहांची ओळख पटवणे शक्य होणार आहे.  औरंगाबाद मध्येही अशीच एक घटना समोर आली आहे. एका महिलेच्या मृतदेहाची ओळख पटत नसल्याने तिची कवटी अजिंठा पोलिसांनी मुंबईला परिक्षणासाठी पाठवली आहे. यात थ्रीडी सुपरइप्मोजिशन तंत्रज्ञानाची मदत घेऊन मृतदेहाची ओळख पटणार आहे.

तीन महिन्यांपूर्वीची घटना आहे. अंदाजे २५ ते ३० वर्षीय महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत पोलिसांना सापडला होता. या मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर ही हत्या असल्याचे निष्पन्न झाले होते. तीन महिने झाले तरी मृतदेहाची ओळख पटेना हे पाहून पोलिसांनी आज बेगमपुरा स्मशानभूमीजवळ दफन केलेल्या कबरीतून या मृतदेहाच्या सांगाड्यातील अवयव काढून घाटी रुग्णालयातील डॉक्टरांसोबत ते मुंबईला पाठवले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कबरीतून काढलेल्या मृतदेहाच्या कवटीद्वारे त्या महिलेचा चेहरा बनवण्यात येणार आहे.शिवाय याद्वारे तिची ओळख पटण्यासाठी मदत होणार आहे, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण आहेर यांनी दिली.

या महिलेच्या मृत्यूनंतर महिलेच्या मृतदेहाचा दफनविधी बेगमपुरा स्मशानभूमीत करण्यात आला. तिची ओळख पटवण्यासाठी  मृतदेहाचे छायाचित्र संपूर्ण महाराष्ट्रात पाठवून सुद्धा त्याची ओळख पटली नव्हती. यामुळे पोलिसांच्या तपासात अनेक अडथळे निर्माण होत होते. परिणामी तीन महिन्यांच्या काळानंतर मृतदेहाचे अवयव काढून त्याच्याशी मिळताजुळता चेहरा बनवण्यासाठी मुंबई येथे पाठवण्यात आला आहे. या महिलेच्या मृत्यूनंतर शवविच्छेदनाच्या अहवालात हत्या असल्याची खात्री पोलिसांना झाली. १६ ऑक्टोबर २०१८ रोजी अजिंठा पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

थ्रीडी सुपरइम्पोजिशन तंत्रज्ञानाद्वारे चेहरा बनवणे शक्य

थ्रीडी सुपरइम्पोजिशन तंत्रज्ञानाद्वारे चेहरा बनवणे शक्य याची माहिती सांगताना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयातील शवविच्छेदन विभागाचे प्रमुख तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास झिने म्हणाले की, “छिन्न-विछिन्न अवस्थेत सापडलेला मृतदेह, कुजलेले मृतदेह यांच्या चेहऱ्याची ओळख पटवण्यासाठी मुंबईमधील केईएम इस्पितळातील डॉ. पाठक यांच्या नेतृत्वाखाली एक समूह थ्रीडी सुपरइम्पोजिशन तंत्रज्ञानाद्वारे मृतदेहाच्या चेहऱ्याच्या मिळताजुळता चेहरा तयार करतात. त्यासाठी मृतदेहाची कवटी आमच्या टीमने काढून दिली. यासाठी मृतदेहाच्या काही विशिष्ट अवयवाची गरज या प्रणालीला लागते. यामुळे या प्रकरणाच्या तपासाला गती मिळण्यासाठी मदत होत आहे. औरंगाबादमध्ये एका प्रकरणात या प्रणालीचा उपयोग झाला आहे.”