दुष्काळमुळे ज्या गावातील पैशांची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. त्या गावातील विद्यार्थ्यांची फी माफ करण्याचा निर्णय २०१४ – २०१५ तसेच २०१५ – २०१६ साली महाराष्ट्र शासनाने घेतला होता. याचबरोबर विद्यार्थ्यांनी भरलेल्या फीचे पैसे परत देण्यात यावेत असा आदेशही देण्यात आले होते. मात्र मराठवाड्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठांतर्गत येणाऱ्या औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद या चारही जिल्ह्यांची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. याचबरोबर जवळपास आठ कोटींचा निधीही त्या दोन वर्षात देण्यात आला होता. मात्र अद्यापही विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले नाही.
विद्यार्थ्यांचे हक्काचे पैसे परत मिळावे या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले, विद्यार्थ्यांनी उपोषण करूनही विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांची फी परत केली नाही. इतकेच नव्हे तर गेली चार दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांची अद्यापही साधी विचारपूसही केली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे.