मोदी, फडणवीसांच्या जुमलेबाजीला आता जनता कंटाळली : भुजबळ

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना नदीकाठावर आरती करत करत प्रचाराची सुरूवात करत आहे. तर भाजप राममंदिराचा राग आळवत लोकांच्या भावनेला हात घालत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने शिवछत्रपतींच्या रयतेच्या राजाला वंदन करून व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पर्श करून पावन केलेल्या चवदार तळयाला अभिवादन करून राष्ट्रवादी काँग्रसची परिवर्तन यात्रेचा आम्ही शुभारंभ केला आहे. मोदी आणि फडणवीस यांच्या जुमलेबाजी घोषणांना सर्व जनता कंटाळली असून आता देशात आणि राज्यात परिवर्तनाची लाट येणार आहे, असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी काढले.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निर्धार परिवर्तन यात्रेची राज्यातली दुसरी सभा गुहागर विधानसभा मतदारसंघातील शृंगारतळी, चिखली येथे झाली. या सभेला राष्ट्रवादीचे प्रदेशअध्यक्ष जयंत पाटील, जेष्ठ नेते छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सुनिल तटकरे, आ. भास्कर जाधव, महिला प्रदेशाध्यक्षा फौजिया खान, विद्या चव्हाण, चित्रा वाघ, वंदना चव्हाण, आम. अनिकेत तटकरे, आ. संजय कदम सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. छगन भुजबळ पुढे म्हणाले की, जातीय धर्मांधपणा हा पराकोटीचा वाढला असून गोमांस भक्षण केल्याच्या संशयातून पोलिस अधिकारी व नागरिकांना जीवे मारले जात आहे. अल्पसंख्याकांच्या विरोधात नाहक राळ उठविली जात असुन देशामध्ये त्यांना असुरक्षित वाटत आहे. भारतीय स्वातंञ्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या मुस्लिम समुदायाला तुच्छ लेखले जात आहे. तथाकथित धर्मरक्षणवाल्यांना अभय व विरोध सुर काढणाऱ्यांचा आवाज बंद केला जात असल्याचे ते म्हणाले.

साहित्य संमेलनाला येणाऱ्या जेष्ठ साहित्यिक नयनतारा सहगल यांचा आवाज बंद करण्यासाठी त्यांचे निमंत्रण रद्द केले गेले. हे फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राला लाजिरवाणे असल्याचे भुजबळ यांनी ठासून सांगितले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, ना. गडकरींच्या मते अच्छे दिन हे मेहसूस करावे लागते प्रत्यक्षात ते नसते. अश्याप्रकारच्या अनेक जुमलेबाजी करून गेली साडेचार वर्ष तरूणाई, महिला पुरूष व देशाची फसवणूक करायचे काम भाजप सरकारने केले आहेे. रात्री झोपताना आज दिवसभर सरकारने माझी किती लुट केली याचा हिशेब लावत झोपी जाण्याचा दिवस आले आहेत. देशातील सर्व समाजघटकांचा भ्रमनिरास झाला आहे. यासभेत सुनिल तटकरे जयंत पाटील व अजितदादा पवार यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. रत्नागिरी जिल्हयाची दोन्ही निवडणूकांची जबाबदारी पवार साहेबांनी आमदार भास्कर जाधव यांच्यावर टाकल्याचे त्यांनी जाहिर केले.