भरधाव वाळूच्या ट्रकने तिघांना चिरडले ; तिघांचा जागीच मृत्यू

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – पारनेर तालुक्यातील खडकवाडी जवळ आज सायंकाळी नागापूरवाडीला वाळू भरण्यास जात असलेल्या भरधाव वेगातील ट्रकने दुचाकीवरील तिघांना चिरडले. यात महिलांसह युवकाचा समावेश आहे.
मयतांमध्ये गोरक्ष मेंगाळ,आई बुधाबाई मेंगाळ (दोघे, रा.नागापूरवाडी, पळशी, ता. पारनेर),  सुमनबाई डंबे (रा.वनकुटे ता.पारनेर) यांचा समावेश आहे. अपघातानंतर चालक वाहन जागेवर ठेवून पसार झाला.

या अपघातानंतर घटनास्थळी ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे काहीसा तणाव निर्माण झाला आहे. जोपर्यंत तहसीलदार, प्रांताधिकारी व पोलिस निरीक्षक घटनास्थळी येत नाही, तोपर्यंत मृतदेह जागेवरून हलवू देणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. नागरिकांची घटनास्थळी मोठी गर्दी झाली आहे.