या पक्षानी मला बारा वर्षे छळलं !!

दिल्ली :  वृत्तसंस्था – भाजपा च्या राष्ट्रीय परिषदेचा आज दुसरा दिवस आणि शेवटचा दिवस होता यावेळी मोदींनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. देशातील जनतेला मजबूत सरकार हवं आहे पण काँग्रेस ला मजबूर सरकार पाहिजे. ज्याणेकरून त्यांना देशाला लुटता येईल. भ्रष्टाचार करता येईल अशी टीका मोदींनी केली. मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो तेव्हा १२ वर्षांपर्यंत काँग्रेसने मला छळलं, असंही ते म्हणाले.
राष्ट्रीय परिषद रामलीला मैदानावर सुरू होती तिथे मोदी  बोलत होते. ते म्हणाले, ‘महाआघाडीच्या नावाखाली एक इतिहासात अयशस्वी ठरलेला फॉर्म्युला विरोधक पुढे आणत आहेत. या लोकांना मजबूर सरकार (कमकुवत) बनवायचे आहे. सरकार कमकुवत असले की यांचे घोटाळे उघड होत नाहीत. याउलट आम्हाला एक मजबूत सरकार द्यायचे आहे, जे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा हमी भाव देईल, विरोधकांना मात्र कमकुवत सरकार आणून यूरिया घोटाळा करायचा आहे.’
काँग्रेस विकासाच्या आड 
पंतप्रधान मोदी म्हणाले की काँग्रेसची मानसिकता प्रत्येक विकासकामात अडथळा आणण्याची आहे. मेक इन इंडिया, जीएसटी, स्वच्छ भारत अभियान या सर्व योजना-धोरणांना काँग्रेसचा विरोध आहे. काँग्रेस आपल्या बैठकीत जीएसटीचं समर्थन करते, पण त्यासाठी मध्यरात्री बोलावलेल्या संसद सत्रावर बहिष्कार घालते.
संस्थांचा अनादर 
काँग्रेस पक्ष स्वत:ला देशाच्या प्रत्येक संस्थेपेक्षा मोठा समजतो. त्यांना कायदे आणि संस्थांची पर्वा नाही, असा आरोप मोदींनी केला.
काँग्रेसने १२ वर्षं छळलं 
मोदी म्हणाले, ‘यूपीए सरकारच्या काळात अशी एकही संस्था नव्हती, जिनं मला त्रास दिला नाही. मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो तेव्हा १२ वर्षांपर्यंत काँग्रेस आणि तिच्या रिमोटवर चालणाऱ्या अधिकारी, नेत्यांनी मला हरप्रकारे त्रास दिला. २००७ मध्ये तर काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने प्रचारसभेत असं विधान केलं होतं की मोदी लवकरच तुरुंगात जातील.’
‘इमानदार सेवक हवा की कधीही सुट्टीवर जाणारा सेवक हवा’ 
देशाची रात्रंदिन सेवा करणारा, कष्ट करणारा, प्रामाणिक, सर्वांना एकजुटीने ठेवणारा सेवक हवा की घरी समस्या असताना २-३ महिने सुट्टीसाठी अज्ञात स्थळी जाणारा, चोरी करणारा सेवक हवा हे जनतेनेच ठरवावे, असं आवाहनही मोदींनी केले.